ठाणेः ठाणे-भिवंडी महामार्गावर यापुढे वाहतूक कोंडी झाली तर खारेगाव टोलनाक्यावर टोलवसुली करण्यात येऊ नये, असे आदेश सार्वजानिक बांधकाम उपक्रममंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. गेले तीन दिवस ठाणे-भिवंडी महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. त्यावर तोडगा काढण्यासाठी एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक बोलवली होती.


या बैठकीत नवी मुंबई आणि ठाणे पोलिसांकडून संयुक्तरित्या कंट्रोल रुम उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. जेएनपीटी आणि तलासरी या ठिकाणी ही कंट्रोल रुम उभारण्यात येणार आहेत. तसंच गुजरातला जाणारी अवजड वाहनं भिवंडीऐवजी चाकणमार्गे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान या बैठकीवेळी यापुढे ठाणे-भिवंडी मार्गावर वाहातूक कोंडी झाल्यास, खारेगाव टोल नाक्यावर टोल न घेता वहान सोडली जातील, असे आदेश शिंदे यांनी दिले. याचबरोबर भिवंडीला असलेली गोडाऊनमध्ये दोन शिफ्टमध्ये करणे, आणि मानकोलीच्या अदीपासून असलेला पाईप लाईन रोड दुरूस्त करून हलकी वाहाने तिथून जाण्यास परवानगी देण्याच्याही सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

या बैठकीला ठाणे आणि नवी मुंबई वाहतूक विभागाचे महत्वाचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत या उपाययोजनांवर चर्चा


  • जेएनपीटी आणि तलासरी या दोन ठिकाणी मोठे वाहन डेपो उभे रहातील.

  • नवी मुंबई आणि ठाणे पोलिसांच्या संयुक्त कंट्रोल रूमने वाहने कधी बाहेर सोडायची, याचा तत्कालिन परिस्थिती नुसार निर्णय होईल.

  • जेएनपीटीहून गुजरातला जाणारी अवजड वाहने ही सर्व चाकणमार्गे गुजरातला जातील.

  • वाहतूक कोंडी होईल तेव्हा खारेगाव टोल नाक्यावर टोल न घेता वाहने सोडली जातील.

  • भिवंडीला असलेली गोडाऊन दोन शिफ्टमध्ये काम करतील.

  • मानकोलीजवळील पाईप लाईन रोड दुरूस्त करून हलकी वाहने त्या मार्गावरुन सोडली जातील.

  • या सर्व निर्णयांची अंमलबजावणी तत्काळ केली जाणार.