नवी दिल्ली:  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कलाकारांना धमकावण्याऐवजी, दिल्लीत जाऊन पाकिस्तानचं दुतावास बंद करून दाखवावं, असं आव्हान सपा नेते अबू आझमी यांनी दिलं आहे.


उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या मनसेने पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासात मुंबई सोडावी, अशी धमकी दिली आहे. त्यानंतर अबू आझमींनी मनसे आणि राज ठाकरेंनाच पाकिस्तानी दुतावास बंद करण्याचं आव्हान दिलं आहे.

राज ठाकरे, तुमच्यात दम असेल तर ....


"भारतात येऊन अतिरेक्यांनी आमच्या 18 सैनिकांना मारलं. यामुळे सैन्याचं मनोबल खचलं आहे. पाकिस्तानचा बदला घ्यायला हवा. मात्र त्याचा अर्थ पाकिस्तानी कलाकार, खेळाडूंना धमकी देणे नव्हे. जर राज ठाकरेंमध्ये इतका दम असेल, तर त्यांनी स्वत: दिल्लीत जाऊन पाकिस्तानी दुतावास बंद करुन दाखवावं. पाकिस्तानी कलाकारांना व्हिजा देणाऱ्या भारतीय दुतावासाला बंद करुन दाखवावं. तर मी समजेन तुम्ही काही काम केलं". असं टीकास्त्र अबू आझमींनी सोडलं.

तुम्ही इकडे आलेल्या कलाकार, खेळाडूंना धमकी देता. ते घाबरुन तुमच्याकडे येतील, मग तुम्ही त्यांच्याशी सेटलमेंट करुन 'डील' कराल, हे मूर्खपणा आहे, असा घणाघातही अबू आझमींना केला.