MNS Opposes Ind vs Pak Match : आयसीसीने (ICC) क्रिकेट विश्वचषक 2023 चं (World Cup 2023) वेळापत्रक जाहीर केले आहे. विश्वचषकातील पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या स्टेडियममध्ये 15 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान सामना (India Pakistan Match) आयोजित करण्यात आला आहे, ज्यावरुन विरोध सुरु झाला आहे. पाकिस्तानसोबतच्या सामन्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) विरोध केला आहे. 


"भारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारतात होणं हे अजिबात पटणारं नाही. बाळासाहेब ठाकरे यांनाही कदापि पटलं नसतं," असं संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी म्हटलं आहे. तसंच याबाबत भाजप आणि शिवसेनेची भूमिका काय असा सवलाही त्यांनी विचारला आहे. सोबतच उद्धव ठाकरे यांच्यावरही संदीप देशपांडे यांनी निशाणा साधत त्यांनी हिंदुत्त्व सोडल्याची टीका केली आहे.


भाजप आणि शिवसेनेची भूमिका काय?


संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन लिहिले की, "भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे अजिबात न पटणार आहे. हे मा.बाळासाहेबांना कदापिही पटलं नसतं आणि तो सामना नरेंद्र मोदी स्टेडियम व्हावं हे तर पटूच शकत नाही. यावर भाजप आणि शिवसेना यांची काय भूमिका आहे? उ बा ठा यांना विचारत नाही आहे कारण त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे."


पाकिस्तानसोबत सामना खेळण्याबाबत सस्पेन्स






दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या सामन्याबाबत सस्पेन्स कायम आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसी आणि बीसीसीआयकडे भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्याचे ठिकाण बदलण्याची मागणी केली होती, मात्र आयसीसी आणि बीसीसीआयने ती विनंती फेटाळून लावली होती.


पाकिस्तान संघाला चेन्नईमध्ये अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरुमध्ये सामने खेळायचे नव्हते, चेन्नई आणि बंगळुरु या दोन्ही ठिकाणांची अदलाबदल करण्याची मागणी पीसीबीकडूनही करण्यात आली होती. पाकिस्तानचा संघ हा सामना खेळण्यासाठी भारतात येणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, असं आजतकच्या वृत्तात म्हटलं आहे.


भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध


आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 च्या वेळापत्रकानुसार, क्रिकेटच्या महाकुंभाचा पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. 19 नोव्हेंबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाईल. यासोबतच 20 नोव्हेंबरचा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. 46 दिवस चालणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलिया संघासोबत होणार आहे.


VIDEO : Sandeep Deshpande Full PC : ODI World Cup 2023 साठी Pakistan संघ भारतात खेळणार, मनसेचा विरोध



हेही वाचा


विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर झालं तरीही पाकिस्तानचा ख्वाडा, आयसीसीला आशा कायम