Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीत मत रद्द केल्याप्रकरणी शिवसेना आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (High Court) धाव घेत याचिका दाखल केली आहे. राज्यसभा निवडणुकीत त्यांचे मतदान रद्द केल्याप्रकरणी याचिका दाखल करत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे. "निवडणूक आयोगानं माझी बाजू न ऐकताच निर्णय दिला आहे, तो मला मान्य नाही", असं सुहास कांदे यांनी म्हटलं आहे. तसेच, माझी बाजू ऐकून घेतली पाहिजे होती. त्यामुळे माझी प्रतिमा मलिन झाली आहे, या याचिकेवर 15 जून रोजी हायकोर्टात सुनावणी करण्यात येणार आहे. 


मत बाद करताना निवडणूक आयोगानं काय निकष लावला? 


निवडणूक आयोगाने आमदार सुहास कांदे यांचे मत बार ठरवतांना जो निकष लावला तो असा की, न दुमडलेली मतपत्रिका घेऊन कांदे फिरत होते. ती इतरांनाही दिसल्यानं नियमाचं उल्लंघन झालं. त्यामुळे त्यांचं मत बाधक ठरतं. शेवटी मतमोजणी करताना आमदार सुहास कांदे यांची मतपत्रिका बाजूला ठेवून मतमोजणी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. 


अकरा तासानंतर निकाल 


दरम्यान शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणल्या गेलेल्या आणि अतिरिक्त मतांच्या मुठी अधिकाधिक घट्ट झालेल्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी विधानसभेच्या आवारात सकाळी मतदानास सुरूवात झाली. सर्व पक्षांतर्फे कडेकोट बंदोबस्तात आमदार दाखल झाले, मात्र दुपारनंतर तांत्रिक मुद्द्यावरून मतदान केंद्र राजकारणाचे व्यासपीठ बनले. आकड्यांचे खेळ आणि राजकीय डावपेचांनी रंगलेल्या राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांची निवडणूक प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी थरारक राहिली. महाविकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतांवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे भाजप पोहोचते. यानंतर तब्बल अकरा तासांपेक्षा अधिक काळ लोटून गेल्यावर ही निवडणूक आयोग मतमोजणीचा निर्णय जाहीर करू शकला नव्हता. दरम्यान रात्री एकच्या सुमारास आयोगाने अखेर निर्णय जाहीर केल्यानंतर निकाल देण्यात आला. 


दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर तसेच शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्याची मागणी भाजपाने केली होती. तर महाविकास आघाडीने भाजपाचे सुधीर मुनगंटीवार तसेच अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतावर आक्षेप नोंदवला होता. मात्र निवडणूक आयोगाने जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुधीर मुनगंटीवार, रवी राणा यांची मतं ग्राह्य धरत सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Rajya Sabha Election 2022 : म्हणून निवडणूक आयोगाने आमदार सुहास कांदे यांचं मत बाद ठरवलं!