मुंबई : राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात एनआरसीच्या समर्थनार्थ मनसेचा 9 फेबुव्रारी रोजी मुंबईत मोर्चा आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी राज ठाकरे यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र अवघ्या दहा मिनिटांतच राज ठाकरे बैठक आटोपून रंगशारदा सभागृहातून बाहेर पडले. जनजागृतीसाठी मनसे आपला मोर्चा मुस्लीम बहुल भागातून नेण्याची तयारी करत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान प्रकृती अस्वाथ्यामुळे राज ठाकरे उशिरा सभागृहात पोहोचले आणि पदाधिकाऱ्यांना सूचना करुन निघाले, अशी माहिती समोर येत आहे.


मुंबईतील गोरेगाव इथे 23 जानेवारीला झालेल्या मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या समर्थनासाठी मनसे 9 फेब्रुवारीला मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यासाठी राज ठाकरेंनी आज मनसे पदाधिकाऱ्यांची वांद्र्यातील रंगशारदा इथे सकाळी दहा वाजता बैठक बोलावली होती. राज ठाकरे साडेबाराच्या सुमारास रंगशारदा सभागृहात पोहोचले आणि त्यानंतर बैठकीत फक्त दहा मिनिटांची उपस्थिती लावून राज ठाकरे बाहेर पडले.

राज ठाकरे यांना थ्रोट इन्फेक्शन झालं आहे. त्यासाठी त्यांची डॉक्टरांची अपॉईंटमेंट होती. त्यामुळे ते बैठकीला उशिरा पोहोचले. या बैठकीत राज ठाकरे यांनी दोन महत्वाच्या सूचना केल्या. एक म्हणजे मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका. कारण, तो मान बाळासाहेब ठाकरेंचा त्यांनी सांगितलं. तर, दुसरं म्हणजे पक्षाच्या झेंड्याचा मान राखा, कारण त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे, अशी माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली.

मोर्चांना मोर्चातून उत्तर : राज ठाकरे

मुंबईतील राज्यव्यापी अधिवेशनात हिंदुत्त्वाचा पुरस्कार करत मनसे भगवीमय केल्यानंतर, राज ठाकरेंनी त्यांचा मोर्चा पाकिस्तान आणि बांग्लादेशातून आलेल्या घुसखोरांविरोधात वळवला. सीएए आणि एनआरसी कायद्याला विरोध करणाऱ्यांविरोधात मनसे 9 फेब्रुवारीला विराट मोर्चा काढणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं होतं. तसेच सीएए विरोधातील मोर्चांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्चातून उत्तर देईल, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली आहे.

संबंधित बातम्या

तुमचा धर्म तुमच्या घरात आचरणात आणा, मशिदींवरचे भोंगे कशाला हवेत?, राज ठाकरेंचा हिंदुत्वाचा सूर


मी रंग बदलून सरकारमध्ये जाणारा नाही, नाव न घेता राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला



VIDEO | मराठी आणि हिंदू धर्माला धक्का लावाल तर अंगावर जाईन : राज ठाकरे