मुंबई : रस्त्यावर तयार होणारा चिकन शॉर्मा खाल्ल्याने मानखुर्दमध्ये अनेकांना विषबाधा (Mankhurd Shawarma Food Poison) होऊन त्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर इतर अनेक जणांना विषबाधा (Food Poisoning) झाल्याचं समोर आलं आहे. प्रथमेश विनोद घोक्षे असे मयत तरुणाचे नाव आहे. तर इतर जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  


मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे खाद्य पदार्थ विक्री होत आहे. यातीलच आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रेजा शेख यांच्या शॉर्मा विक्रीच्या गाडीवरून प्रथमेशसह विभागातील अनेकांनी शॉर्मा खाल्ला होता. यामुळे प्रथमेशला मोठ्या प्रमाणात उलटी आणि पोट दुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.


अनेकांना विषबाधा


याच दरम्यान महाराष्ट्र नगरमध्ये याच गाडीवरुन शॉर्मा खाल्ल्याने त्रास होणाऱ्यांच्या तक्रारी येऊ लागल्या. वेगवेगळ्या ठिकाणी दहा ते बारा जणांनी उपचारासाठी धावही घेतली. मात्र आज सकाळी उपचार सुरु असताना प्रथमेशची तब्येत खालावली आणि त्याचा मृत्यू झाला. तर इतर चार जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी रस्त्यावर निकृष्ट शॉर्मा बनवून विकणाऱ्या आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रेजा शेख या दोघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. मुंबईच्या रस्त्यावर असे निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ मोठ्या प्रमाणात बनवून त्याची विक्री केली जाते. यावर पालिकेचे नियत्रणं राहिलेले नाही. यामुळे एक तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.


रेल्वेतील अंडा बिर्याणीतून विषबाधा 


नागपूरमधील रेल्वेच्या स्टॉलवरील बिर्याणी खाल्ल्यामुळे यशवंतपूर एक्स्प्रेसमधील 40 प्रवाशांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात घडली होती. यशवंतपूरवरून निघालेली ही गाडी गोरखपूरकडे जात असताना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील बल्लारशा स्थानकावरील जनआहारमधून या गाडीत अंडा बिर्याणीचे जवळपास दोनशे पार्सल पाठविण्यात आले होते. तसेच नागपूरच्या जनआहार स्टॉलवरुनही काही पार्सल या ट्रेनमध्ये पाठवण्यात आले होते. 


ट्रेन सुरु झाल्यानंतर प्रवाशांनी ही बिर्याणी खाल्ली. यशवंतपूर एक्स्प्रेसने इटारसी स्थानक सोडून गोरखपूरच्या दिशेने प्रवास सुरु केल्यानंतर अंडा बिर्याणी खाल्लेल्या प्रवाशांना त्रास जाणवायला लागला. ट्रेनमधील जवळपास 40 जणांना उलट्यांचा त्रास सुरु झाला. काही प्रवाशांना मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरु झाला. 


हे सर्व प्रवाशी वेगवेगळ्या डब्यात होते. त्यामुळे सुरुवातीला कोणाला या घटनेचे गांभीर्य कळाले नाही. मात्र संपूर्ण ट्रेनमधील प्रवाशी उलट्या करत आहेत हे कळाल्यानंतर त्यामुळे काही काळासाठी घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. 


या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून तातडीने हालचाली करण्यात आल्या. त्यामुळे कानपूर रेल्वे स्थानकात डॉक्टरांचे एक पथक यशवंतपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चढले. या डॉक्टरांच्या पथकाने तातडीने सर्वजणांवर उपचार केले. त्यानंतर सर्वांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. 


ही बातमी वाचा: