Maharashtra weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnange) होत आहे. सध्या सगळीकडे उन्हाचा चटका वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं नागरिकांच्या अंगाची काहीली होतेय. दरम्यान, जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrav Khule) यांनी दिलेल्या माहितीनुसार गुढीपाडव्यापर्यंत म्हणजे 6 ते 9 एप्रिल यादरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण ढगाळ राहणार आहे. यामध्ये काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता देखील माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. 


कुठं आहे पावसाची शक्यता?


माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी 8 एप्रिलला विदर्भातील गोंदिया, भंडारा नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात व लगतच्या परिसरात अवकाळी पावसाची शक्यता अधिक जाणवत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी  सावधानतेने पीक काढणीच्या कामाचे नियोजन करावं, असं आवाहन माणिकराव खुळे यांनी केलं आहे.  


काही भागात तापमानात वाढ


सध्या मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील दुपारी 3 चे कमाल तापमान हे 40 ते 42 डिग्री से. ग्रेडच्या श्रेणीत जाणवत आहे. साधारणपणे ते सरासरी कमाल तापमानापेक्षा 3 ते 4 डिग्रीने अधिक आहे. विदर्भात अधिक उष्णता जाणवत आहे. विदर्भात दुपारचे तापमान हे 40 डिग्री सेल्सिअसच्या तुलनेत पाहिजे. कोकणात मात्र, दुपारचे तापमान हे 32 ते 33  डिग्री सेल्सिअसच्या आसपास असते. जास्त उष्णतेची स्थिती उद्यापर्यंत म्हणजे 5 एप्रिलर्यंच जाणवेल अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिलीय. विदर्भात काही ठिकाणी उद्या आणि परवा दोन दिवस उष्णतेच्या लाटेची तर रात्री उकाड्याची स्थिती जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात तसेच लगतच्या गोवा राज्यात आजपासून पुढील तीन दिवस दिवसा दमटयुक्त उष्णतेचा अनुभव येईल. 


महत्वाच्या बातम्या:


Heatstroke : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी 'अशी' घ्या काळजी