मुंबई : ‘महापारेषण’कडून मुंबई उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईतील विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. या नगरांमध्ये कोणत्याही प्रकारचं भारनियमन सध्या नसल्याची माहिती ‘महापारेषण’कडून देण्यात आली.


'महापारेषण'च्या कळवा येथील 400/200 kv EHV सब स्टेशनमध्ये गुरुवारी रात्री तांत्रिक बिघाड झाला होता. मात्र इतर माध्यमातून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला असल्याची माहिती ‘महापारेषण’ने दिली. त्यामुळे उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या केंद्रातून 'महावितरण'च्या भांडुप नागरी परिमंडळातील ठाणे मंडळाअंतर्गत नवपाडा, कोपरी, विटावा, कळवा, मुलुंड (पूर्व आणि पश्चिम) या परिसरात, तर वाशी मंडळाअंतर्गत वाशी, ऐरोली, घणसोली, रबाळे, ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत, तुर्भे MIDC,कोपरखैरणे, बोनकोडे  या परिसरात वीज पुरवठा होतो.

कळवा येथील 400/200 kv EHV सब स्टेशनमध्ये पहिल्या युनिटचं वाय फेजमधील ऑईल फिल्ट्रेशन पूर्ण करण्यात आलं आहे. रोहित्राची जळालेली केबल काढून नवीन केबल टाकण्याचं काम 80 टक्के पूर्ण झालं आहे, तर उर्वरित काम प्रगतीपथावर आहे.

महापारेषण आणि महावितरणचे अधिकारी तांत्रिक बाबी दुरुस्त करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. त्यामुळे या काळात कमीत कमी वीज वापरुन सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.