मुंबई : दिल्लीला सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हजारोच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले. आपल्या मागण्या घेऊन राजभवनाकडे निघालेल्या शेतकऱ्यांना मुंबईत मेट्रो सिनेमा चौकात अडवलं आहे. राज्यपालांना भेटण्यासाठी शेतकरी आंदोलक आणि काँग्रेस नेते आक्रमक झालेले पाहायला मिळालं. राज्यपालांशी भेट झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही, असं अजित नवले यांनी सांगितलं आहे. दरम्यान शिष्टमंडळाला पोलिसांच्या गाडीत बसवून घेऊन जात असल्याचं देखील समोर आलं आहे. या शिष्टमंडळात सचिन सावंत, भाई जगताप, चरणसिंह सप्रा, मेधा पाटकर, अशोक ढवळे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.


मोर्चा अडवल्यानंतर आक्रमक झालेल्या अजित नवले यांनी सांगितलं की, राज्यपाल पळून गेले. आम्हाला अडवलं गेलं. पोलिस ही देखील शेतकऱ्यांची पोरं आहेत. त्यांनाच आमच्या विरोधात उभं केलं आहे. शेतकऱ्यांचा अवमान केलं आहे राज्यपालांनी. आमच्याच भावांना आमच्या विरोधात उभं केलं आहे, असा आरोप अजित नवले यांनी केला आहे. आमचा लढा भाजपशी आणि त्यांच्या दलालांशी आहे. पोलिस आमचे भाऊ आहेत, आमचा त्यांच्याशी संघर्ष नाही. राज्यपाल येईपर्यंत आम्ही मेलो तरी इथून जाणार नाही, असं नवले यांनी सांगितलं.


Maharashtra Farmers Protest LIVE UPDATES | शेतकऱ्यांचा मोर्चा मेट्रो सिनेमा ठिकाणी पोलिसांनी अडवला, राजभवनावर जाण्यावर आंदोलनकर्ते ठाम


काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, राज्यपाल पळून गेले. कंगणा रनौतला भेटायला गोव्याला जातात हे अत्यंत निषेधार्ह बाब आहे. आम्ही शिष्टमंडळ जाणार होतो. हे राज्यपाल आल्यापासून ही पहिली वेळ नाही. ते याआधीही पळून गेले होतो. राज्यपाल पळपूटे आहेत, असं ते म्हणाले.


आम्ही राजभवनावर जाऊन निवेदन देणार आहोत. राज्यपालांनी वेळ दिली होती. त्यांनी हा मोर्चा पाहून पळ काढला. आता राजभवनावर जाऊन आम्ही पुढं काय करायचं ते ठरवू असं भाई जगताप म्हणाले.


सिंघू बॉर्डरपाशी दिल्लीतील दडपशाहीला तोंड देत शेतकरी ठाण मांडून त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. हे कृषी कायदे शेतकरी विरोधीच नाही, तर साऱ्या जनसमुदायाविरोधातील कायदे आहेत, असं अशोक ढवळे म्हणाले.