मुंबई : अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चाचं (Akhil Bharatiya Kisan Sabha Morcha ) वादळ शेकडो किलोमीटरच्या प्रवासानंतर रविवारी रात्री अखेर मुंबईत धडकलं. हजारोंच्या संख्येनं शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले असून, राज्यात पडलेला थंडीचा कडाका सोसत या परिस्थितीतही हा बळीराजा भक्कमपणे न्याय मिळवण्यासाठी पाय रोवून उभा आहे.


ऊन, वारा झेलत मुंबईत पोहोचलेल्या शेतकऱ्यांच्या या मोर्चासमोर या मायानगरीतही धुकं आणि थंडीचं आवाहन होतं. पण, त्यातही ही मंडळी बिथरली नाहीत. याच परिस्थइतीबाबत आणि प्रतिकूल वातावरणाबाबत प्रतिक्रिया देत शेतकऱ्यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधत कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय आपण मागे न हटण्याचा निर्धार व्यक्त केला.


नाशिकमध्ये घाटणदेवी इथं मुक्कामी राहिल्यानंतर हा मोर्चा मुंबईच्या दिशेनं आला. इथंही वातावरणात असणाऱा गारवा त्यांच्यापुढं उभा ठाकला होता. रात्रीच्या वेळी दव पडल्यामुळं शेतकऱ्यांची पांघरुणंही ओली झाली होती. पण, यामुळं शेतकऱ्यांचा आत्मविश्वास मात्र डगमगला नाही. 'सरकारनं पाऊलच असं उचललं की या थंडीचीही तमा न बाळगता शेतीविषयक काळे कायदे मागे घेतलेच पाहिजेत या निर्धारानं आम्ही इथं आलो आहोत. परिणामी या थंडीचंही आम्हाला काही वाटलेलं नाही, कारण भविष्य इतकं अंधकारमय आहे की, तो अंधार हटवायचं असेल तर हे सारं धुकं, थंडीचा मारा आम्हाला सोसावंच लागेल', असं येथील शेतकरी म्हणाले.


सरकारकडून हे कृषी कायदे मागे घेतले जात नाहीत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोवर आमचा हा निर्धार कायम राहणार आहे, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी व्यक्त केली.


Azad Maidan Farmers Protest LIVE UPDATES | शेतकऱ्यांचं 'लाल वादळ' मुंबईत धडकलं!


दरम्यान, शेतकऱ्यांच्या या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. आज, 25 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 60 दिवसांपासून दिल्लींच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी झालेले आहेत. आजच्या दिवशी बडे नेते, खुद्द शरद पवार आणि महाविकासआघाडीतील मंत्रीही या मोर्चात सहभागी होणार आहेत.