Maharashtra Cabinet Expansion:

  राज्यातला मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet) विस्तार महिना उलटून गेल्यानंतरही रखडला आहे. तब्बल 36 दिवस सरकार स्थापन होऊन झाले तरी शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा (Cabinet Expansion) मुहूर्त ठरला नाही. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीवारी केली. मात्र तरीही विस्तार लांबणीवर पडला आहे, कोर्टाच्या निर्णयानंतर विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला का घाबरत आहात असा सवाल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विचारला आहे त्याचं कारणही तसेच आहे कारण सरकार येऊन 36 दिवस झाले तरीही नव्या सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळत नाही. त्यामुळे कोर्टाचा निर्णय झाल्यानंतरच विस्तार होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.


शिवसेना बंडखोर आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार अद्याप कायम आहे. सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. येत्या ८ तारखेला यावर सुनावणी होईल. आता हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवलं जातं की आणखी काही निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे पण त्यानंतरच विस्तार होण्याची शक्यता आहे.


भाजपकडून कुणाला संधी मिळू शकते?


चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)


सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)


गिरीश महाजन (Girish Mahajan)


राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe)


बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar)


प्रवीण दरेकर (Pravin Darekar)


रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan)


नितेश राणे (Nitesh Rane)


 


केंद्रीय भाजप राज्यात गुजरात पॅटर्न करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. पण प्रादेशिक, जातीय आणि संघटनात्मक गणित पाहता राज्यात हे अशक्य असल्याचं सांगितलं जात आहे. तरीही काही ज्येष्ठ नेत्यांना नारळ देऊन नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.


शिंदे गटाकडून कुणाला संधी मिळू शकते?


गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)


उदय सामंत (uday Samat)


दादा भुसे (Dada Bhuse)


शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)


अब्दुल सत्तार (Abdul Sattar)  


दीपक केसरकर (Deepak Kesarkar)


संदीपान भुमरे (Sandipan Bhumare)


संजय शिरसाट (Sanjay Shirsat) 


पहिल्या टप्प्यात फक्त 15 ते 16मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता 

पहिल्या टप्प्यात फक्त 15 ते 16 मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं यात प्रत्येक जिल्ह्याला संधी मिळणार नाही तरी प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला जाईल. शिंदे गटातून पहिल्या टप्प्यात औरंगाबादचे तब्बल तीन मंत्री होत आहेत, याचा पेचही आहे. 
 
मंत्रिमंडळ विस्तार आज होईल उद्या होईल, दोन दिवसात होईल तीन दिवसात होईल अशा अनेक डेड लाईन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून भाजपच्या नेत्यांनी जाहीर रित्या दिल्या होत्या. परंतु अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त का मिळत नाही या प्रश्नाचे ठोस उत्तर कोणाकडेही नाही. कदाचित कोर्टाच्या निकालानंतरच याचे उत्तर मिळू शकेल.