Dahi Handi 2022 : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना (Covid19) महामारीमुळे दहीहंडीवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यंदा दहीहंडी (Dahi Handi 2022)साठी असे निर्बंध नाहीत. सोबतच सरकारनं सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर केली आहे. मुंबईत खासकरुन दहीहंडीचा (Mumbai Dahi Handi News) उत्साह मोठ्या प्रमाणात असतो. असं असलं तरी गोविंदांच्या सुरक्षेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतात. दहीहंडीदरम्यान काही वेळा दुर्घटनांमध्ये गोविंदा जखमी किंवा मृत्यूमुखी पडतात. अशा वेळी त्यांच्या परिवाराची अवस्था बिकट होते. या पार्श्वभूमीवर यंदा गोविंदांना विमा सुरक्षा कवच देण्यासाठी मनसे आणि भाजपनं पुढाकार घेतला आहे. 
 
मनसेची चिलखत योजना, 1 हजार गोविंदांचा 100 कोटींचा मोफत विमा 
काही दिवसांवर आता दहीहंडी येऊन ठेपली आहे. त्याची तयारी सगळीकडेच सुरु झाली आहे. मानवी मनोरे रचण्याच्या सरावासाठी गोविंदा रात्री जागवत आहेत. प्रत्यक्ष दहिकाल्याच्या दिवशी नवी मुंबईतल्या अपघातग्रस्त होणाऱ्या गोविदांना मनसेकडून ‘सुरक्ष कवच’ देऊ केले आहे.  या योजनेअंतर्गत दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे रचणाऱ्या 1 हजार गोविंदांचा 100 कोटींचा मोफत विमा काढण्यात येणार आहे. दहीहंडी उत्सवाच्या दिवशी अनेक गोविंदा जखमी होतात. काही वेळा मृत्यूमुखीही पडतात. त्यांच्या नातेवाईकांना मदत मिळावी यासाठी मनसेने गोविंदासाठी ‘विमा सुरक्षा कवच’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतील विम्याची मुदत 19 ऑगस्टचा पूर्ण दिवस असेल. ‘सुरक्षा कवच’ योजनेचा लाभ घेण्यासाठी गोविंदा पथकांनी मंडळाच्या लेटरहेडवर गोविंदांची वयासह नावे नोंदवून मनसे मध्यवर्ती कार्यालय, सीवूड्स येथे जमा करावीत, असं आवाहन मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केले आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या गोविंदांना किंवा पथकांना कोणताही खर्च करावा लागणार नाही, असंही गजानन काळे यांनी स्पष्ट केले.


या योजनेनुसार, गोविंदाच्या अपघाती मृत्यू आल्यास कुटुंबियांना 10 लाख रुपये, कायम स्वरुपी अंपगत्व आल्यास 10 लाख रुपये अपघातामुळे रुग्णालयातील खर्च 1 लाख रुपये असं विमा सुरक्षा कवच मनसेच्यावतीने मिळणार आहे. तरी या योजनेचा नवी मुंबईतील गोविंदांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असं आवाहन मनसेचे नवी मुंबई शहरअध्यक्ष गजानन काळेंच्या वतीने करण्यात आलं आहे.






भाजपकडून गोविंदांसाठी 10 लाखांचा वीमा देण्याचं 


भाजपकडून देखील गोविंदांसाठी 10 लाखांचं विमा कवच देण्यात आलं आहे. दहिहंडीत दरवर्षी अनेक गोविंदा आपले अवयव गमवतात,त्यांची काळजी आपणच केली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून गोविंदांसाठी 10 लाखांचा वीमा देण्याचं मुंबई भाजपनं जाहीर केलंय.गोविंदांनी यात सहभाग घ्यावा, असं भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे.