Loudspeakers Controversy in Maharashtra : भोंग्यावरुन राज्यभरात वातावरण तापलं असताना राज्य सरकारनेही हालचाली सुरू केल्या आहेत. भोंग्याच्या मुद्यावरून राज्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी गृहखात्याने मोठा निर्णय घेतला  आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी अनिवार्य करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याशिवाय, भोंग्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे. 


भोंग्याच्या मुद्यावरून राज्यात मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने 3 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यानंतर आता संभाव्य तणाव टाळण्यासाठी गृहविभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यातील प्रार्थनास्थळांना भोंगे लावण्यासाठी परवानगी घेणे अनिवार्य असणार आहे. त्याशिवाय, राज्यभर भोंग्यांसंदर्भात सर्व मार्गदर्शक सूचनांचं कटाक्षानं पालन करण्याचे आदेश दिले जाणार असल्याची माहिती गृहखात्यातील सूत्रांनी दिली.


भोंग्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तांचा अल्टिमेटम


राज ठाकरेंनी मशिदीवरचे भोंगे उतरवण्यासाठी ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. मात्र, मनसेच्या या भूमिकेनंतर नाशिक पोलिसांनी आदेशाचा भोंगा वाजवला आहे.. सध्या धडाकेबाज निर्णयासाठी चर्चेत आणि वादाच्या गर्तेत सापडलेल्या नाशिक पोलीस आयुक्तांनी धार्मिक स्थळांवरच्या ध्वनीक्षेपकांबाबत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार सर्वच धार्मिक स्थळांना भोंग्यांसह इतर ध्वनीक्षेपक यंत्रणांसाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. अजान सुरु असताना मशिदीच्या १०० मीटर परिसरात हनुमान चालिका पठणास नाशिक पोलिस आयुक्तांनी मनाई केली आहे. जो या नियमांचं उल्लंघन करेल त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: