मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde)  वेळ मिळत नसल्यानं कोकण म्हाडाच्या (Konkan Mhada) घरांची सोडत रखडल्याचं चित्र आहे. कोकण म्हाडा मंडळाच्या 5 हजार 311 घरांच्या विक्रीची सोडत अजुनही झालेलीच नाहीये. तसंच यामधले 24 हजार अर्जदार सोडतीच्या प्रतिक्षेत आहेत.  म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 घरांच्या सोडतीतील 2970 घरांसाठी (प्रथम प्राधान्य योजनेतील घरे वगळून) 13 डिसेंबरला सोडत काढण्यात येणार होती. मात्र अचानक प्रशासकीय कारण देत ही सोडत पुढे ढकलण्यात आली.


ठाणे शहर आणि जिल्हा, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्गातील गृहनिर्माण सदनिकांचा समावेश आहे. तसंच सप्टेंबरमध्ये निघालेल्या जाहिरातीची सोडत अद्यापही निघालेलीच नाहीय. यापूर्वी दोन वेळा म्हाडाने सोडतीची तारीख पुढे ढकलली होती.  तसंच म्हाडा हेल्पलाईनवर देखील अर्जदारांना प्रतिसाद मिळत नाही. तसंच निवडणुकीची आचारसहिंतेची म्हाडा अर्जदारांना भीती आहे.  कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे.  यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1010 सदनिकांचा समावेश आहे.  


लवकरच नवीन तारीख जाहीर करणार


तसेच एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1037 सदनिका,  सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 919  सदनिका, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी 67 सदनिका तर कोंकण मंडळाच्या प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विखुरलेल्या 2278 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.    वेळापत्रकानुसार या घरांसाठी 13 डिसेंबरला सोडत काढण्यात येणार होती. मात्र सतत वेगवगळी कारणे देत  ही सोडत पुढे ढकलण्यात आली. सोडत पुढे ढकलतानाच लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाईल असे मंडळाकडून सांगण्यात आले होते. मात्र आता नव्या वर्षाचा दुसरा आठवडा सुरु झाला तरी सोडतीची तारीख जाहीर झालेली नाही.


अर्जदारांची तारखेची  प्रतीक्षा


कोकण मंडळाकडून  सोडतीची तारीख जाहीर होत  नाही. त्यामुळे अर्जदारांमध्ये नाराजी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोडत काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. पण 1डिसेंबरला अधिवेशन असल्याने मंडळाने सोडतीची तारीख पुढे ढकलली. तर अजूनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची वेळ मिळत नसल्याने सोडत रखडली आल्याचेही सूत्रांनी सांगितले. तेव्हा आता सोडतीला केव्हा मुहूर्त लागतो आणि अर्जदारांची प्रतीक्षा कधी संपते हाच आता प्रश्न आहे. 


हे ही वाचा :