कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर मद्यधुंद तरुणींनी गोंधळ घातल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. टपरी चालकाने सिगरेट न दिल्यामुळे तरुणींनी त्याला शिवीगाळ करत त्याच्या टपरीतील सामानाची फेकाफेक केली. या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही तरुणींना पोलिस ठाण्यात आणलं आणि समज देत सोडून दिलं.


संबंधित 19 वर्षीय तरुणी डोंबिवलीतील कोपर गावात राहणारी असून उच्चभ्रू कुटुंबातील आहे. काल रात्री कल्याणला एका मैत्रिणीकडे ती पार्टी करण्यासाठी आली होती. त्यानंतर पहाटेच्या सुमारास ती मैत्रिणीसोबत कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील टपरीवर सिगरेट घेण्यासाठी आली.

टपरीचालकाने सिगरेट द्यायला नकार दिल्यामुळे तरुणीचा पारा चढला आणि तिने टपरीचालकाला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसंच त्याच्या टपरीवर असलेलं सामानही तिने फेकून दिलं.

हा प्रकार सुरु बघ्यांची गर्दी जमली, मात्र दोन्ही तरुणी मद्यधुंद अवस्थेत दिसत असल्याने कुणीही हस्तक्षेप केला नाही. अखेर एमएफसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तरुणींना पोलिस ठाण्यात आणलं. या तरुणींच्या कुटुंबियांना बोलावून त्यांच्यासमोर तरुणींना समज देण्यात आली.

टपरी चालकाने या तरुणींविरोधात तक्रार न केल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आलं. मात्र या प्रकारामुळे पालकांचं आपल्या तरुण मुला-मुलींकडे लक्ष आहे का? आणि मुलं बाहेर जाऊन काय करतात? याची माहिती पालकांनी ठेवणं गरजेचं नाही का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.