मुंबई : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील हल्ला भ्याड आणि निंदनीय आहे. हा हल्ला पाहून 26/11 मुंबई हल्ल्याची आठवण झाली, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेएनयू हल्ल्याचा निषेध केला. तसंच जेएनयूसारखा प्रकार राज्यात होऊ देणार नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थ्याच्या केसांनाही धक्का लागणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिली. जेएनयू हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज 'मातोश्री' या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन हल्ल्याचा निषेध केला.


नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये रविवारी (5 जानेवारी) मास्कधारी हल्लेखोरांना राडा घातला. हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्यांसह मुलींच्या हॉस्टेलवर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी यावेळी जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोषलाही मारहाण केली. सर्व हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल किंवा मास्क लावले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या 18 जणांना उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी हल्ला केल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेने केला आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थी सुरक्षित
देशात इतर ठिकाणी जे काही घडतंय ते अयोग्य असलं तरी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना काहीही होऊ देणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातल्या युवकांना मी सांगेन की ते राज्यात सुरक्षित आहेत यावर विश्वास ठेवा. इतर ठिकाणी जे काही घडतंय ते अयोग्य असलं तरी राज्यात तुम्हाला काहीही होणार नाही. आम्ही इथे बसून राज्यातील युवकांना आश्वस्त करतो की ते सुरक्षित आहेत. गरज असल्यास राज्यातील विद्यापीठांतील सुरक्षा वाढवली जाईल. तरुणांच्या मनात असलेला उद्रेक माझ्याही मनात आहे, त्यामुळे त्यांनी शांत राहावं. मी महाराष्ट्रात काहीही होऊ देणार नाही

26/11 ची आठवण झाली  
जेएनयूमध्ये हल्ला करणारे बुरखाधारी डरपोक होते. त्यांच्यात समोर येण्याचं धाडस नाही. ते जे कोण आहेत त्यांना कठोर शासन झालंच पाहिजे. जे झालं ते टीव्हीवर पाहून मला 26/11 ची आठवण झाली आणि मी हे देशात घडू देणार नाही. पोलिसांनी इथे जर केवळ बघ्याची भूमिका घेत कारवाई केली नसेल तर त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होतं.

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

- महाराष्ट्रातल्या युवकांना मी सांगेन की ते महाराष्ट्रात सुरक्षित आहेत याचा विश्वास ठेवा
- इतर ठिकाणी जे काही घडतंय ते अयोग्य असलं तरी राज्यात तुम्हाला काहीही होणार नाही
- काल जेएनयूमधे जे झालं ते बुरखाधारी डरपोक होते, त्यांच्यात समोर येण्याचं धाडस नाही
- ते जे कोण आहेत त्यांना कठोर शासन झालच पाहिजे आणि ते नाही झालं तर मग विचार करु शकतो ती यामागे राजकारण आहे का
- जे झालं ते टीव्हीवर पाहून मला 26/11 ची आठवण झाली आणि मी हे देशात घडू देणार नाही
- अशाप्रकारचा विरोध होणं स्वाभाविक आहे. कारण देशात जे होतंय ते होणं अपेक्षित नाही
- आम्ही इथे बसून राज्यातील युवकांना आश्वस्त करतो की ते सुरक्षित आहेत
- पोलिसांनी इथे जर केवळ बघ्याची भूमिका घेत कारवाई केली नसेल तर त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होतं
- गरज असल्यास राज्यातील विद्यापीठांतील सुरक्षा वाढवली जाईल, मात्र मी विद्यार्थ्यांना आश्वस्त करतो की त्यांना काहीही होणार नाही
- तरुणांच्या मनात असलेला उद्रेक माझ्याही मनात आहे, त्यामुळे त्यांनी शांत राहावं.
- मी महाराष्ट्रात काहीही होऊ देणार नाही

संबंधित बातम्या