मुंबई : देशातल्या पहिल्या भुयारी मेट्रो प्रकल्पाचे पंचवीसावे ब्रेक थ्रू पार पडले. वरळी सायन्स सेंटरपासून दूरदर्शन या अतिशय वर्दळीच्या आणि दाटीवाटीव्या परिसरात 2.07 किलोमीटरच्या टप्प्याचा पहिला ब्रेकथ्रू पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. गेल्या काही वर्षात वरळी कमर्शियल हब बनले आहे. त्यामुळे इथे दररोज येणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी हा अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातोय. या पॅकेज अंतर्गत महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, अकॅहरी अत्रे चौक व वरळी या स्थानकांचा समावेश आहे. मुंबईच्या पोटात सुरू असलेलं हे काम नेमकं चालतं कसं? ब्रेक थ्रू म्हणजे काय? या सर्वांचा या बातमीत आढावा घेतला आहे.


मुंबईच्या उदरात जवळपास 60 ते 70 मीटर खोल हे भुयारीकरणाचं काम सुरू आहे.
भुयार खोदणाऱ्या या एका टीबीएमचं वजन साधारण 400 टन आहे.
असे 17 अवाढव्य मशीन्स मुंबई मेट्रोसाठी भुयार तयार करतायत.
टीबीएम जेव्हा ठरवलेल्या भुयारी मार्गावर खोदकाम पूर्ण करते त्याला ब्रेकथ्रू म्हणतात
या टिबीएमची नावं सुद्धा इंटरेस्टिंग आहेत, वैणगंगा, कृष्णा, सूर्या.
गेली तीन वर्ष हे काम सुरू आहे. या टीबीएमला 24 सप्टेंबर 2018 रोजी पहिला ब्रेक थ्रू मिळाला होता.
याची माहिती तत्कालिन प्रमुख अश्विनी भिडे वेळोवेळी ट्विटरवरुन शेअर करत होत्या.
आज वरळीत आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत पंचविसावा ब्रेकथ्रू पूर्ण झाला.
आता दररोज 70-75 लाख मुंबईकरांना लोकल ट्रेनने अमानवी पद्धतीने प्रवास करावा लागतो.
1700 क्षमता असलेल्या एका लोकलमध्ये 4500 प्रवाशी प्रवास करतात, साधारण एका स्क्वेअर मीटर जागेत 12 ते 15 प्रवासी कोंबून घेतात.
पुढच्या अकरा वर्षात या महानगराची लोकसंख्या साडेतीन कोटीवर जाईल असा अंदाज आहे.
त्यामुळेच 12 मेट्रो लाईन्सचं जाळं लोकलवरील हा ताण कमी करेल आणि मुंबईकरांचं जीवन काहीसं सुखकर करेल अशी आशा बाळगली जात आहे.
त्याचाच एक भाग मुंबई मेट्रो - 3 ही कुलाबा ते सीप्झ ही मेट्रो.



पर्यावरण प्रेमींच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेणार - आदित्य ठाकरे
आरे कार शेडबाबत समितीचा अहवाल प्राप्त झाला असला तरी तो बाईंडिंग नाही. मुख्यममत्र्यांकडे अहवाल दाखल झाला आहे. त्यावर अभ्यास आणि विचार करून योग्य निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया उद्घाटनानंतर पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांचं काम विरोध आणि मागणी करणं आहे, ते त्यांना करत राहू दे. पर्यावरण प्रेमींच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईन. नाईट लाईफ बंधनकारक नाही. ज्या व्यापाऱ्यांना दुकानं उघडी ठेवायची असतील त्यांनी ठेवावीत, ज्यांना नाही ठेवायची त्यांच्यावर कसलंही बंधन नाही. नाईट लाईफ कायदे आणि नियमानुसारच लागू होणार, असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Mumbai Metro 3 | मेट्रोच्या तिसऱ्या प्रकल्पातील भुयारीकरणाचा 25 वा टप्पा पूर्ण | ABP Majha