मुंबई : कोरोना संकटामुळे देशातील सर्वाधिक श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचं कंबरडं मोडलं आहे. कोरोनाचे संकट निवारण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च करावे लागत असताना दुसरीकडे महसुलाद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातही प्रचंड तूट निर्माण झाली आहे. परिणामी मुंबई महापालिकेला पहिल्यांदाच बँकेत असलेल्या ठेवींना हात घालावा लागत आहे.


सर्वात श्रीमंत महापालिकेच्या श्रीमंतीचा एक दाखला म्हणजे 70 हजार कोटींच्या एफडी. 2003 पासून वेगवेगळ्या बँकांमध्ये महापालिकेची ही पुंजी साठवण्यात आली आहे. मात्र कोरोना संकटात आता प्रथमच महापालिकेवर एफडी तोडण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत कोरोना संदर्भातील गोष्टींवर सुमारे 1300 कोटी रुपयांवर खर्च महापालिकेकडून करण्यात आला आहे. ज्यापैकी 900 कोटी रुपये हे आकस्मिक निधीतून काढण्यात आले आहेत. तर ऊर्वरीत निधीसाठी बँकेतील ठेवींना हात घालावा लागणार आहे.


मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमध्ये सुमारे 70 हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यातच या ठेवींवरील व्याजदरही कमी झालेले असल्याने यंदा 1400 कोटी रुपयांचे व्याजही कमी मिळणार आहे. जमेची बाजू म्हणजे राज्य सरकारने कोरोना संकटासाठी मुंबई महापालिकेला 1 हजार कोटी रुपयांची मदत दिल्याची माहिती मिळत आहे.