मुंबई : मुंबईतल्या डोंगरी भागात 100 वर्ष जुन्या चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 9 जण जखमी आहेत. मृतांमध्ये सात पुरुष, चार महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. तर सर्व जखमींना उपचारांसाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.


घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान, पोलिस आणि एनडीआरएफच्या पथकाकडून अद्यापही बचावकार्य सुरु आहे. जोपर्यंत ढिगारा पूर्णपणे बाजूला केला जात नाही तोपर्यंत बचावकार्य सुरु राहिल, असं एनडीआरएफकडून सांगण्यात आलं आहे

केसरबाई नावाची ही इमारत जुनी असून म्हाडाची असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. महापालिकेने काही दिवसांपूर्वीच धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली होती. परंतु त्या यादीत या इमारतीचा समावेश नाही. त्यामुळे ही इमारत नेमकी कशी कोसळली हे अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, या दुर्घटनेनंतर केसरबाई इमारतीच्या शेजारील इमारतीही रिकाम्या करण्याचं काम सुरु झालं आहे.

घटनेतील मृतांची नावं

साबिया निसार शेख (25 वर्ष)

अब्दुल सत्तार कलु शेख (55 वर्ष)

मुझामिल मन्सूर सलमानी (15 वर्ष)

सायरा रहमान शेख (25 वर्ष)

जावेद इस्माई (34 वर्ष)

अरहान शहजाद (40 वर्ष)

कश्यप अमीराजन (13 वर्ष)

सना सलमानी (25 वर्ष)

झुबेर मन्सूर सलमान (20 वर्ष)

इब्राहिम (दीड वर्ष)

अरबाज (7 वर्ष)

शहजाद (8 वर्ष)

जखमींची नावं

फिरोझ नाझीर सलमानी (45 वर्ष)

आएशा शेख (3 वर्ष)

सलमा अब्दुल सत्ता शेख (55 वर्ष)

अब्दुल रहमान (3 वर्ष)

नावेद सलमान (35 वर्ष)

इमरान हुसेन कलवानिया (30 वर्ष)

जावीद (30 वर्ष)

झीनत (25 वर्ष)

अल्मा मोहम्मद राशीद इद्रिशी (28 वर्ष)

डोंगरीतील दुर्घटनेची सर्वंकष चौकशी : मुख्यमंत्री  फडणवीस

म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतीत याचा समावेश नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर इमारतीच्या पुनर्विकासासाठी विकासकाची नियुक्ती केली होती. विकासकाने काम वेळत केलं की नाही याची चौकशी केली जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले.  डोंगरी परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची सर्वंकष चौकशी केली जाईल. यादरम्यान दुर्घटना स्थळी बचाव व मदत कार्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क आणि सक्रिय केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  मुख्यमंत्री म्हणाले, ही इमारत शंभर वर्षे जुनी आहे. त्यामुळे ती धोकादायक म्हणून घोषित केली होती. तिच्या पुनर्विकासाचे काम विकासकाकडे सोपविण्यात आले होते. पण त्यामध्ये दिरंगाई का झाली याची चौकशी केली जाईल. या ठिकाणी 15 कुटुंबं राहतात. त्यामुळे दुर्घटनेत अडकलेल्यांपर्यंत पोहचणे बचाव व मदत कार्यास गती देण्यावर भर दिला जात आहे.


"डोंगरीतील केसरबाई इमारतीचा भाग आज सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी कोसळला. प्राथमिक माहितीनुसार 40 ते 50 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. एनडीआरएफची तीन पथक, अग्निशमन दल, आपत्कालीन व्यवस्थापन पथक तसंच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं," असं आवाहन मुंबई महापालिकेने ट्विटरद्वारे केलं होतं.