मुंबई : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव दिसून येत आहे. शहरातील covid-19 च्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत ठाण्यात तब्बल 17 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 226 वर पोचली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात covid-19 च्या रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने केंद्रीय पथकाने देखील दोन दिवसांपूर्वीच ठाणे महानगरपालिका क्षेत्रात भेट दिली आणि कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.


सुरुवातीला केवळ दोन आकडी रुग्ण संख्या असलेल्या आणि अतिशय कमी प्रमाणात नवीन रुग्ण सापडत असलेल्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आता मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. आज एका दिवसात तब्बल 17 नवीन रुग्णांची भर पडली आहे. यात लोकमान्य नगर आणि काजूवडी येथे 3 रुग्ण, वागळे इस्टेटमध्ये सी.पी. तलाव इथे 4, मुंब्रा, कासारवडवली, कळवा प्रत्येकी एक रुग्ण तर वर्तकनगर परिसरात 4 रुग्ण, पाचपखाडी येथे दोन आणि किसन नगर येथे एक अशाप्रकारे 17 रुग्ण ठाण्यात रविवारी आढळले. रविवारी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 4 इतकी आहे. तर शनिवारी हीच संख्या 29 एवढी होती. आतापर्यंत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बधितांची संख्या 185 एवढी असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.


पाहा व्हिडीओ : ठाणे महानगरपालिकेच्या गेटवर निर्जंतुकीकरण मशीन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी



दरम्यान, देशातील लॉकडाऊन 3 मे रोजी संपणार आहे. अशातच महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता. राज्यातील लॉकडाऊन 18 मेपर्यंत वाढणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांमधून येत आहे. मात्र, अद्याप तसा कोणताही निर्णय झाला नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी बोलताना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शिथिलता येणार नसल्याचंही त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील दुकानं उघडण्याची तुर्तास शक्यता नाही. मात्र, ग्रीन झोन असलेल्या ठिकाणी पूर्णपणे सीमा बंद करुन काही महत्वाच्या व्यवहारांना परवानगी देण्याची शक्यता असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे.


राज्यासाठी दिलासा


देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. अशात राज्यासाठी एक सकारात्मक बातमी आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याच वेग मंदावला आहे. महाराष्ट्रात डबलिंग रेट हा तीन दिवसांवरुन सातवर गेला असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. आपल्या राज्यात देशातील सर्वाधिक कोरोना चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत देशात एक लाखाहून अधिक कोरोना चाचण्या झाल्या असल्याची माहिती टोपे यांनी दिल्या आहेत.


संबंधित बातम्या : 


लॉकडाऊन वाढवण्यासंबंधी अद्याप निर्णय नाही; राजेश टोपे यांच्याकडून स्पष्ट


दिलासादायक! आज कोरोना बाधितांची वाढ निम्म्याने घटली; दिवसभरात 440 नवीन रुग्णांची नोंद


कोरोनाशी झुंजताना मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबांना 50 लाख अन् सरकारी नोकरी : गृहमंत्री