मुंबई : भिवंडी शहरात मागील आठवड्यापासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच मृतांची संख्या अकरावर पोहचली आहे. दोन दिवसांपूर्वी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्ण महिलेस ऑक्सिजनचा वेळेवर पुरवठा होऊ न शकल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावरून रुग्णालयातील व्यवस्था तकलादू असल्याचे सिद्ध होत असतानाच, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रुग्णालयास भेट देत या महिलेचा मृत्यू ही हत्या असून त्यास उद्धव ठाकरे सरकार आणि रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. शंभर दिवस झाले परंतु उद्धव ठाकरे सरकार रुग्णलयांची परिस्थिती सुधारण्यात सरकार अपयशी ठरलं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


भिवंडी शहरातील गोपाळनगर परिससरात राहणाऱ्या पति-पत्नीला कोरोनाची लागण झाल्याने त्यांना आयजीएम कोविड रुगणालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यादरम्यान 55 वर्षीय महिलेचा 31 मे रोजी दुर्दैवी अंत झाला परंतु, रुग्ण महिलेस ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांकडून सुरु झाल्याने या घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नुकताच आयजीएम हॉस्पिटल आणि मनपा मुख्यालयास भेट दिली. त्यानंतर घडलेल्या प्रकारासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल थोरात आणि आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्याशी विस्तृत चर्चा केली. या चर्चेदरम्यान रुगणालायत 20 व्हेंटिलेटरची गरज असून सध्या फक्त चार उपलब्ध असल्याची महिती डॉ. अनिल थोरात यांनी दिली. त्यावेळी शासन बीकेसी येथे अद्यावत रुग्णालय उभारते, ते बंदही करते परंतु, भिवंडी शहरातील रुग्णलयाच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करीत आहे. याप्रकरणाबाबत खेद व्यक्त करीत मुख्यमंत्री फक्त फेसबुकवर लाईव्ह दिसतात. परंतु शंभर दिवसात ते कोरोनाचा मुकाबला करण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.


भिवंडी शहरातील आयजीएम कोविड रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा वेळेत न झाल्याने मृत्यू झालेल्या महिलेच्या हत्येस फेसबुकवर बडबड करणारे उद्धव ठाकरे सरकार, रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.