Congress Mumbai President:  मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून (Mumbai Congress) भाई जगताप (Bhai Jagtap) यांना हटवण्यात आले आहे. भाई जगताप यांच्या जागी आमदार आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज ही नियुक्ती जाहीर केली आहे. मागील वर्षी  झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे प्रथम क्रमांकाचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. हंडोरे यांचा पराभवच भाई जगताप यांना भोवला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 


आगामी मुंबई महापालिकेच्या तोंडावर काँग्रेसमध्ये भाकरी फिरवण्यात आली आहे. आमदार भाई जगताप यांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून दूर करण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी वर्षा गायकवाड यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वर्षा गायकवाड या धारावी मतदारसंघाच्या आमदार आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्या काँग्रेसमध्ये सक्रीय आहेत. दिवंगत माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या त्या कन्या आहेत. वर्षा गायकवाड यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करून काँग्रेसकडून अनुसूचित जातींच्या मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे म्हटले जात आहे. मागील काही वर्षात अल्पसंख्याक, अनुसूचित जाती-जमाती आदी काँग्रेसचा मतदार घटक पक्षापासून दूर गेला होता. 


आक्रमक भाई जगताप यांची गच्छंती का?


भाई जगताप हे आक्रमक स्वभावाचे ओळखले जातात. भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर मुंबईत काँग्रेसने विविध मुद्यांवर आंदोलनेदेखील केली. आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठीची चाचपणी सुरू केली होती. काँग्रेसचा आक्रमक चेहरा असणारे भाई जगताप यांना एका अहवालामुळे दूर सारण्यात आल्याची चर्चा आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी समिती नेमली होती. काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी काँग्रेस हायकमांडला सादर केलेल्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली.


मागील वर्षी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांना पहिल्या पसंतीचे उमेदवार असून पराभव स्वीकारावा लागला. तर, दुसऱ्या पसंती क्रमाचे उमेदवार भाई जगताप विजयी झाले. हंडोरे यांच्या पराभवामुळे काँग्रेसबद्दल अनुसूचित जातींच्या वर्गामध्ये नाराजी होती. 


भाई जगताप काय म्हणाले?


मुंबई काँग्रेसचे मावळते अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटले की,  मला पदावरून हटवलं नाही. या उलट माझ्याशी बोलून हा निर्णय घेतला गेला असल्याचे त्यांनी म्हटले. वर्षा गायकवाड यांचा फायदा नक्की पक्षाला होईल. दलित चेहरा वगैरे काँग्रेस असं काही मतभेद करत नाही. सर्वांना घेऊन चालणारं नेतृत्व म्हणून वर्षा गायकवाड यांची नेमणूक झाली असल्याचे भाई जगताप यांनी म्हटले.