मुंबई : मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) समुद्रातील पुलाच्या पहिल्या गाळ्याच्या उभारणीचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (15 जानेवारी) करण्यात येणार आहे. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (शिवडी - न्हावा - शेवा मार्ग) प्रकल्पातला भारतातला सर्वात मोठ्या लांबीचा समुद्रावरील पुल मुंबईत उभा राहणार आहे.


ठाणे खाडीवर उभ्या राहणाऱ्या या 22 किमी लांबीच्या पुलाने दक्षिण मुंबईतला शिवडीचा भाग नवी मुंबईला जोडला जाणार आहे. या प्रकल्पामुळे, मुंबई शहर थेट रायगडशी जोडलं जाणार आहे. रायगड जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्ग 4 वरच्या चिर्ले गावापर्यंत मुंबईचा विस्तार होणार आहे. त्यामुळे, रायगड जिल्ह्यातील नाव्हा-शेव्हा बंदर आणि अलिबाग मुरुड किनाऱ्यापर्यंत पोहोचता येणार आहे.


मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा मार्ग मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासोबतही जोडला जाईल. ज्यामुळे पुण्याहून दक्षिण मुंबईकडची वाहतूक सुलभ होईल. यासोबतच प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळही दक्षिण मुंबईहून कमी वेळात गाठता येईल.


आज काय होणार?
स्वयंचलित लॉन्चिंग गर्डरद्वारा पुलाच्या प्रकल्पाच्या पहिल्या स्पॅनची उभारणी (erection of first span) आज होत आहे. या लॉन्चिंग गर्डरचे वजन एक हजार मे. टन असून लॉन्चिंग गर्डरची वजन उचलण्याची एकूण क्षमता सुमारे एक हजार 400 मे. टन इतकी आहे.


कसा आहे मुंबई पारबंदर प्रकल्प?
1. मुंबई पारबंदर प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवडी आणि मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे 22 किमी लांबीच्या 6 पदरी (6+3 मार्गिका) पुलाचा अंतर्भाव आहे.


2. या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे 16.5 किमी असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे 5.5 किमी इतकी आहे.


3. या पुलाला मुंबई शहरातील शिवडी आणि मुख्य भूमीवरील शिवाजी नगर आणि राष्ट्रीय महामार्ग-4 ब वर चिर्ले गावाजवळ आंतरबदल (Interchanges) प्रस्तावित आहेत. हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा समुद्रावरील पूल ठरणार आहे.


4. हा प्रकल्प जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेच्या (JICA) कर्ज सहाय्याने राबविण्यात येत आहे. प्रकल्पाचे बांधकाम हे 3 स्थापत्य कंत्राटांद्वारे आणि 1 इंटेलीजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम कंत्राटाद्वारे करण्यात येणार आहे. पुलाच्या पायाचे आणि स्तंभांच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.


5. त्याचप्रमाणे सेगमेंट कास्टींग आणि तात्पुरत्या पुलाच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.


6. 2018 मध्ये या प्रकल्पाच्या कामाची सुरुवात झाली आहे. प्रकल्पाचा बांधकाम कालावधी सुमारे साडेचार वर्षांचा असून त्यानुसार सप्टेंबर-2020 पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.


समुद्रावरील सर्वात मोठा ब्रीज ठरणार!
मुंबई शहर थेट रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 4 वरील चिर्ले गावात पोहचणार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील नाव्हा - शेव्हा बंदर आणि अलिबाग मुरुड किनाऱ्यापर्यंत थेट पोहचता येणार आहे. राज्य सरकारच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई ते रायगड जिल्ह्यातील नाव्हा-शेव्हा परीसरात पोहचण्यासाठी लागणाऱ्या वेळेत मोठी बचत होणार आहे.



गर्डच्या कामादरम्यानचे छायाचित्र (फोटो केडिट - शाहीद खान )