मुंबई : भाजपला 105 जागा मिळाल्या आहेत. अपक्षांच्या पाठिंब्याने भाजपकडे असलेल्या आमदारांची संख्या 119 आहे. यामुळे राज्यात भाजपशिवाय सरकार स्थापन होऊच शकत नाही असे सांगत भाजपचेच सरकार पुन्हा येईल असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी हा विश्वास व्यक्त केला असल्याचे चंद्रकात पाटील यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.


तीन पक्षांचे सरकार येणार आणि पाच वर्षे टिकणार, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे, याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता राज्यात भाजपकडे 119 आमदारांची संख्या आहे. आमच्याशिवाय राज्यात स्थिर सरकार येऊ शकत नाही असा आम्हाला विश्वास आहे, असं पाटील म्हणाले. आमची कोणाशीही चर्चा सुरू नाही, पण राज्यात आमच्याशिवाय स्थिर सरकार कोणी देऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

भाजपच्या कालपासून तीन बैठका झाल्या आहेत. विधानसभेत निवडून आलेले आमदार आणि अपक्ष आमदारांसोबत या बैठकांमध्ये चर्चा झाली. बूथ ते राष्ट्रीय अध्यक्षांची रचना यावर यात चर्चा झाली असल्याचे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकात सर्वाधिक मतं भाजपला मिळाली आहेत. नंबर दोनची मतं शिवसेनेला आणि त्यानंतर राष्ट्रवादीला मतं मिळाली आहेत, असेही पाटील म्हणाले. राज्यात सर्वात जास्त महिला आमदार, SC -ST आमदार भाजपचे आहेत. कुठल्याही पक्षाला 100 पेक्षा जास्त जागा मिळवता आलेल्या नाहीत, असेही पाटील यांनी सांगितले. 1990 पासून कुठल्याही पक्षाला शंभरपेक्षा जास्त जागा मिळवता आलेल्या नाहीत, असेही पाटील यांनी सांगितले.
एकतर भाजपसोबत किंवा भाजपचंच सरकार येणार, फडणवीस यांचा बैठकीत निर्धार : सूत्र

परतीचा पाऊस जास्त झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यावर या बैठकीत चर्चा झाली. सर्व आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेऊन अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना देण्यात आल्या. सरकारकडून मदत दिली जाणार आहेच. मात्र 23 हजार कोटींचे इन्श्युरन्स कव्हर राज्यात आहे. त्या माध्यमातून मदतीसाठी प्रयत्न केले जावेत, अशा सूचना दिल्या गेल्या आहेत, असे पाटील यांनी सांगितले. कालच राफेल संबंधी सुप्रीम कोर्टाने दिला. राहुल गांधींनी देशाची दिशाभूल केली. यासाठी राहुल गांधींनी देशाची माफी मागायला हवी, यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत, असे पाटील म्हणाले.

पाटील म्हणाले की, बूथ, मंडल ते जिल्हा स्तरावर संघटना मजबूत करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षक नेमून निवडणुकीचे विश्लेषण करणार आहोत, असेही पाटील यांनी सांगितले.