मुंबई : राज्यात भाजपशिवाय सत्ता येऊच शकत नाही, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सर्व आमदारांना दिला असून एकतर भाजपसोबत किंवा भाजपचंच सरकार येणार असल्याचा निर्धार फडणवीस यांनी या बैठकीत केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी फडणवीस यांनी आमदारांना शेतकऱ्यांच्या बांधावर आणि लोकांमध्ये जाऊन हे ठासून सांगण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती देखील आहे. सत्ता स्थापनेच्या वेळेस मुंबईत बोलवू, तोपर्यंत जनतेत जाऊन भाजप सरकार येणार हा विश्वास द्या, असेही फडणवीस यांनी सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


भाजपच्या कार्यकारिणीची बैठक आज झाली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. दरम्यान, भाजप सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर लक्ष ठेवून असल्याचे भाजप आमदार आशिष शेलार यांनी बैठकीनंतर सांगितले होते. आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस हेच आहेत. सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे ते म्हणाले होते.

राज्यातील राजकीय परिस्थितीवर आणि इतर पक्षातील सुरू असलेल्या चर्चेवर आमचं लक्ष आहे, असेही शेलार म्हणाले होते. राज्यभरात 90 हजार बुथवर संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. त्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. तसेच उद्यापासून ग्रामीण भागातील आमदार आणि परवापासून शहरी भागातील आमदार तसेच विधानपरिषदेच्या आमदारांसह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात दोन ते तीन दिवसांचा मदत पाहणी दौरा करणार आहेत, असे शेलार यांनी सांगितले.

आज प्रथमच भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. या बैठकीला नितेश राणे, शिवेंद्र राजे भोसले, गणेश नाईक, कालिदास कोळंबकर प्रथमच भाजपच्या कमळावर निवडून आलेल्या आमदारांसह भाजपचे सर्व आमदार आणि पाठिंबा दिलेले तसेच मित्रपक्षांचे आमदार देखील उपस्थित होते. आजच्या बैठकीला उपस्थित आहेत. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, व्ही सतीश, विजय पुराणिक यांच्या नेतृत्वात भाजप आमदारांची बैठक ही बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच 'देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है' अशी घोषणाबाजी करण्यात आली.