मुंबई: नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिजच्या तक्रारीसाठी विशेष क्रमांकाची सुविधा देण्यात आली असून 'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन' (8169681697) चा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबईकरांनी तक्रार केल्यानंतर तातडीने कचरा आणि डेब्रिज उचलला गेला पाहिजे. त्यासाठी मुंबई महापालिकेने यंत्रणा सतर्क ठेवावी. प्रभावीपणे या यंत्रणेचा वापर करून मुंबईतील रस्ते स्वच्छ, कचरामुक्त करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


दरम्यान, मुंबईतील पुनर्विकासाच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. वर्षा निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास राज्याचे बंदरे विकास आणि खनीकर्म मंत्री दादा भुसे, खासदार राहुल शेवाळे, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, रस्त्यालगत असलेला कचरा, डेब्रिज उचलण्यासाठी मुंबईकरांना संपर्क क्रमांक करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आजपासून 8169681697 या व्हाटस्अप क्रमांकाच्या 'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन' वर मुंबईकरांना तक्रार नोंदविता येणार आहे. या क्रमांकावर नागरिकांनी कचरा, डेब्रिज बाबत तक्रार नोंदविल्यानंतर आठ तासात त्यावर कार्यवाही अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


या प्रणालीसाठी महापालिकेने 350 कनिष्ठ अवेक्षक (ज्युनिअर ओरशिअर) यांची नेमणूक केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने करावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नुकतेच भारतातील जपानचे राजदूत यांनी माझी भेट घेतली होती. त्यांनी देखील बदलेल्या मुंबईचे कौतुक केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मुंबईकरांना अपेक्षित मुंबई करण्याचं काम आमच्या सरकार मार्फत केल जात असून त्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत. 


मुंबईतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून त्यामाध्यमातून खड्डेमुक्त मुंबई संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात येत आहे. मुंबईत सुशोभिकरणाचे 1150 प्रकल्प सुरू असून त्याचे दृष्यस्वरुपात बदल दिसत आहेत. रोषणाई करण्यात आली असून समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेची मोहिम हाती घेण्यात आली आहे. मुंबईत 170 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत. कोळिवाड्यांचा विकास, प्रदूषणमुक्त मुंबईला चालना देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण -


मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याचे सांगत पुनर्विकासाची प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. म्हाडा, एमएमआरडीए, सिडको, मुंबई महापालिका, महाप्रित यासारख्या शासकीय संस्थांच्या माध्यमातून बंद पडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


नालेसफाई बाबत तक्रारीसाठी मुंबई महापालिकेने संपर्क क्रमांक यंत्रणा उपलब्ध करून दिली असून 15 जूनपर्यंत तक्रारी स्विकारण्यात येणार आहेत.  1 ते 5 जून दरम्यान 102 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 89 तक्रारींचे निराकरण केल्याचे महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले. 


अशी आहे 'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन' सुविधा -


बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात, सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना थेट नोंदवता यावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अॕप हेल्पलाईन' कार्यान्वित झाली आहे. नागरिकांना 8169681697 या हेल्पलाईन क्रमांकावर घनकचरा तसेच बांधकाम राडारोडा (डेब्रीज) विषयक तक्रारी नोंदविता येतील. महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने नागरिकांच्या सुविधेसाठी कचऱ्याशी संबंधित तक्रारी नोंदवण्यासाठी कार्यपद्धती सुनिश्चित केली आहे.


भ्रमणध्वनी वापरकर्त्यांकडून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ही अद्ययावत, सहजसोपी अशी हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. तक्रारीसंबंधीचे छायाचित्र आणि ठिकाण, जीपीएस लोकेशन आदी शेअर केल्यानंतर ही तक्रार हेल्पलाईनमध्ये नोंदवली जाईल. यानंतर, ती थेट संबंधित विभागाकडे पाठवली जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन संबंधित अधिकारी आणि कर्मचारी या तक्रारीचे निश्चित केलेल्या वेळेत निर्मूलन करुन, त्या ठिकाणचे छायाचित्र अपलोड करतील. परिणामी नागरिकांना त्वरित तक्रार निर्मूलन केल्याचे प्रमाण मिळणार आहे.


घनकचरा व डेब्रीज वगळता इतर तक्रारी, सूचना या हेल्पलाईनमध्ये नोंदवता येणार नाहीत, तसेच हेल्पलाईन व्हॉटस्ऍप स्वरुपातील असल्याने त्यावर बोलण्याची, संभाषणाची सुविधा नसेल. या हेल्पलाईनच्या माध्यमातून नागरिकांना थेट तक्रार, सूचना नोंदवण्यासाठी सुविधा मिळणार आहे. दररोज वॉर्ड अधिकारी या तक्रारींवर संनियंत्रण करतील. दर आठवड्याला आयुक्त तक्रार निराकरणाचा आढावा घेतील.