Kirit Somaiya Press Conferance : राणा दाम्पत्याला भेटून खार पोलीस ठाण्याबाहेर पडल्यानंतर शिवसैनिकांनी काल किरीट सोमय्यांवर हल्ला केला. शिवसैनिकांच्या हल्ल्यात किरीट सोमय्यांच्या वाहनाची काचही फुटली आहे. तर त्यांना जखमही झाली. यासर्व प्रकरणासंदर्भात आज किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. काल खार रोड पोलीस स्टेशन येथे जो माझ्यावर हल्ला झाला, तो ठाकरे सरकारनी स्पॉन्सर्ड केलेला हल्ला होता, असा आरोप सोमय्यांनी केला. तसेच, पोलिसांना मी हल्ला होणार असल्याचं सांगितल्यावर त्यांनी व्यक्तीगत जबाबदारी घेतली आणि पोलीस स्थानकाचं दार उघडताच, बाहेर असलेल्या 70-80 गुंडांच्या हवाली माझ्या गाड्यांना करण्याचं पाप उद्धव ठाकरेंच्या पोलिसांनी केलं असल्याचा हल्लाबोलही सोमय्यांनी केला आहे. दरम्यान, सोमय्यांवरच्या हल्ल्यानंतर भाजप नेतेही आक्रमक झालेत. तसंच किरीट सोमय्या उद्या दिल्लीत जाणार असून केंद्रीय गृहसचिवांकडे याप्रकाराबाबत तक्रार करणार आहेत.


भाजप नेते किरीट सोमय्या बोलताना म्हणाले की, "काल खार रोड पोलीस स्टेशन येथे जो माझ्यावर हल्ला झाला, तो ठाकरे सरकारनी स्पॉन्सर्ड केलेला हल्ला होता. मी संध्याकाळी पोलीस स्टेशनला कळवलं होतं, मी रात्री साडेनऊच्या दरम्यान येईल. त्यामुळे मी पोहोचण्यापूर्वीच 70-80 शिवसैनिकांनी खार पोलीस स्टेशनवर व्यवस्था केली होती. पोलीस स्टेशनच्या आवारात, पोलीस स्टेशनच्या दारापाशी जमले होते. येतानाही मला शिवीगाळ करण्याती आली. माझी गाडी थांबवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. आणि परत जाताना मी पोलिसांना सांगितलं, हल्ला करणार आहेत. त्यावेळी त्यांनी व्यक्तीगत जबाबदारी घेतली त्यांनी सांगितलं आम्ही सगळी व्यवस्था केली आहे. पण पोलीस स्थानकाचं दार उघडताच, बाहेर असलेल्या 70-80 गुंडांच्या हवाली माझ्या गाड्यांना करण्याचं पाप उद्धव ठाकरेंच्या पोलिसांनी केलं आहे. यासाठी संपूर्णपणे पोलीस आयुक्त संजय पांडे जबाबदार आहेत." तसेच, पुढे बोलताना पोलिसांनी सांगितलं सगळ्यांना हलवलंय, मग पोलिसांच्या दारात कसं काय? 70-80 गुंडं जमू शकतात? असा सवालही सोमय्यांनी उपस्थितीत केला. 


"मुख्यमंत्र्यांत्री कार्यालयातून, पोलीस आयुक्तांकडून वांद्रे पोलीस स्थानक, खार पोलीस स्थानकात सतत बोलणं सुरु होतं. वांद्रे पोलिसांनी रजिस्टर केलेल्या एफआयआरएवढं संमोहित फक्त ठाकरे सरकारच करु शकतं. त्यामध्ये लिहिलंय की, शिवसैनिक 100 मीटर आणि तीन किलोमीटर दूर आहेत. हे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सांगितलं. तसेच, माझ्या गाडीवर एकच दगड खूप लांबून आला, असं स्टेटमेंट माझ्या नावांनं संजय पांडेंनी दिलं. ही एफआयआर किरीट सोमय्यांच्या नावानं रजिस्टर केली आहे, संजय पांडेंनी. मी वाचल्यानंतर मी सही करणार नाही असं सांगितलं, त्यावेळी मला तिथल्या डीसीपींनी धमकी दिली की, एफआयआर रजिस्टर झाली, ऑनलाईन गेली. तुम्ही सही केली नाहीतरी हिच एफआयआर धरली जाणार. अशाप्रकारची गुंडगिरी ठाकरे सरकारची माफिया पोलीस करु शकतात.", असं किरीट सोमय्या म्हणाले. 


माझा मनसुख हिरेन करण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव : किरीट सोमय्या


"कालचा हल्ला उद्धव ठाकरेंच्या आदेशानं संजय पांडेंनी घडवून आणला. 70-80 लोक घुसतात कसे कंपाउंडमध्ये? सकाळी केंद्राचे कॅबिनेट सचिव राजीवकुमार गौबा यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी गृहसचिव अजय कुमार भल्ला यांना याविषयी चौकशी करायला सांगितलं आहे. उद्या भाजपाचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे. गृह सचिव आणि इतरांची भेट घेणार आहे. किरीट सोमय्याचा मनसुख हिरेन करायचा असं नियोजन संजय पांडे आणि उद्धव ठाकरेंनी केलं आहे.", असं देखील किरीट सोमय्या म्हणाले.