मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून आपण कोरोना संकटाचा सामना करत आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यू दर वाढणे बरोबर नाही. लॉकडाऊन शिथिल केल्याने काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील लोकांना जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे. या कामांत अजिबात ढिलाई नको असे सांगतांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.


राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांच्याकडून कोरोना परिस्थितीचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा मुख्यमंत्र्यांनी आज घेतला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील सहभागी झाले होते.


मुंबई येथे डॉक्टर्सचा टास्क फोर्स आपण स्थापन केला. त्याचा चांगला उपयोग झाला. आता प्रत्येक जिल्ह्यात किंवा विभागात असा टास्क फोर्स करणे गरजेचे झाले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे जुने जाणते, तज्ज्ञ डॉक्टर्स असावेत आणि त्यांचा मुंबईच्या डॉक्टर्सशी देखील कायम संपर्क असावा. आरोग्य मंत्रालयाकडून उपचार पद्धती, औषधी याबाबत विविध सूचना येत असतात, त्यात बदलही होत असतात त्यादृष्टीने वरिष्ठ डॉक्टर्सचा सहभाग वाढवणे महत्वाचे आहे. वेळेत औषधे मिळाली तर रुग्ण बरे होत आहेत हे कितीतरी प्रकरणात सिद्ध झाले आहे. आपले रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही खूप चांगले आहे. प्रयोगशाळांमधून चाचणीचे अहवाल आता लगेच मिळायला पाहिजेत, अशा सुचना असतांना काही ठिकाणी 72 तास लागत असतील तर ती गंभीर बाब आहे. कोणत्याही परिस्थितीत ढिलाई झाली नाही पाहिजे, असे आदेशचं मुख्यमंत्र्यांनी दिले.


ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग केंद्राची नियमावली राबवावी
ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगच्या बाबतीत केंद्राने आणि राज्याने व्यवस्थित मार्गदर्शिका दिल्या आहेत. त्याप्रमाणे योजना राबण्यात आल्या पाहिजे. काही ठिकाणी वरिष्ठ डॉक्टर्स हे आपले वय आणि इतर आजार असल्याने कोविड रुग्णांना तपासत नाहीत. कनिष्ट डॉक्टर्स कोविड जबाबदारी सांभाळत आहेत असे निदर्शनास आले आहे. या वरिष्ठ डॉक्टर्सनी थेट कोविड उपचार करायचे नसतील तर रुग्णालयांत उपस्थित राहून इतर डॉक्टर्सना मार्गदर्शन करू शकतात किंवा संगणक, स्मार्ट फोन कॅमेरा या माध्यमातून स्वत:ला सुरक्षित ठेवून उपचारांचे मार्गदर्शन करणे सहज शक्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


कोरोनासाठी 'मुंबई मेगा लॅब'ची संकल्पना, महिन्यात सर्व मुंबईकरांची चाचणी करण्याचे आव्हान


रिकव्हरी रेट 50 टक्क्यांच्या पुढे
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील अधिक गतीने रुग्णांचे संपर्क शोधणे गरजेचे असल्याचे नमूद केले. आता पावसाला सुरुवात झाली असून इतर रोगांमध्येही वाढ होऊ शकते. अशा वेळी नॉन कोविड रुग्णांना त्वरित उपचार मिळणे गरजेचे आहे, असे ते म्हणले. जिल्ह्यांमध्ये इंडियन मेडिकलब असोसिएशनच्या डॉक्टर्सची देखील टास्क फोर्समध्ये मदत घ्यावी, असेही सांगितले. यावेळी मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, धुळे, लातूर, अमरावती, औरंगाबाद या जिल्ह्यांचा व महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना साथीचा आढावा घेण्यात आला. प्रधान सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास यांनी रुग्ण दुप्पट होण्याचे दिवस 21.3 वरून 23.1 झाले आहेत, रिकव्हरी रेट 50.4 असून देशाचा रिकव्हरी रेट 53.8 इतका तसेच मृत्यू दर 3.7 वरून 4.8 टक्के झाल्याची माहिती दिली.


CM Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा, शिवसेना पक्षप्रमुख लाचार होणार नाही - ठाकरे