...तेव्हा बाळासाहेबांमुळे अमरनाथ यात्रा पार पडली होती : संजय राऊत
एबीपी माझा वेब टीम | 11 Jul 2017 12:35 PM (IST)
मुंबई: अमरनाथ यात्रेवर झालेला हल्ला हा देशावरचा हल्ला आहे, दिल्लीत बसलेल्या सरकारवरील हल्ला आहे. त्यामुळे त्याबाबत केवळ निंदा करण्याची नव्हे तर चोख उत्तर देण्याची वेळ आली आहे, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडली. सर्जिकल स्ट्राईक, नोटाबंदीने काहीच फरक पडला नाही. पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा बंदोबस्त करायला हवा, असं संजय राऊत म्हणाले. तसंच संजय राऊत यांनी 1996 सालच्या अमरनाथ यात्रेची आठवण सांगितली. संजय राऊत म्हणाले, "1996 साली अमरनाथ यात्रेवर संकट होतं. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अमरनाथ यात्रेकरुंच्या केसालाही धक्का लागला तर मुंबईच नव्हे, तर देशातून हज यात्रेसाठी एकही विमान जाऊ देणार नाही असं ठणकावलं होतं. त्यानंतर अमरनाथ यात्रा सुरळीत झाली होती. तशीच कडक भूमिका घेण्याची वेळ आली आहे". "केंद्रातील भाजप सरकारने याला चोख उत्तर द्यायला हवं. चर्चेपेक्षा हल्ल्याचा बदला घ्या. या देशातील 80 कोटी हिंदूंचा वाली कोण", असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.