राजकीय वैमनस्यातून युवकाचा मृत्यू, भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा नातेवाईकांचा आरोप
एबीपी माझा वेब टीम | 03 May 2019 01:57 PM (IST)
मतदानाच्या दिवशी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मनोजशी वाद घातला होता, अशी माहिती मृत युवकाच्या नातेवाईकांनी दिली.

धुळे : धुळे जिल्ह्यातील रामी येथील एका युवकाला पाच ते सहा युवकांनी राजकीय वैमनस्यातून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली आहे. या मारणहाणीत युवकाचा मृत्यू झाला आहे. मनोज उत्तम महाजन असं मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचं नाव आहे. गुरुवारी सायंकाळी 5 ते 6 च्या सुमारास पाच ते सहा युवकांनी मनोजला जबर मारहाण केली. काही वेळात मनोजला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण मनोजचा उपचारा दरम्यानच मृत्यू झाला. मतदानाच्या दिवशी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मनोजशी वाद घातला होता, अशी माहिती मृत युवकाच्या नातेवाईकांनी दिली. मारहाण करणारे पाच ते सहा युवक भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप मनोजच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, युवकाचा मृतदेह धुळे येथे शवविच्छेदनसाठी नातेवाईकांनी आणला आहे. पोलिसांनी या संदर्भात गुन्हा देखील दाखल केला नसल्याचं मृत युवकाच्या नातेवाईकांनी सांगितलं. संतप्त ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केलीय.