यवतमाळ : "राज ठाकरे यांचं म्हणणं खरं आहे. क्रमांक एकचा भाजप पक्ष सत्तेच्या बाहेर पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यवतमाळ इथे काल (2 एप्रिल) आमदार मदन येरावार यांच्याकडे आले असता देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या भाषणावर भाष्य केलं. परंतु राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण न ऐकल्याने जास्त बोलणं  योग्य नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.


"राज ठाकरे बोलत आहेत ते एकप्रकारे सत्यच आहे. कारण एक क्रमांकाचा पक्ष सत्तेबाहेर असल्याचं पाहायला मिळत आहे आणि तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहे. मी त्यांचं पूर्ण भाषण न ऐकल्यामुळे जास्त प्रतिक्रिया देऊ शकत नाही," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.  


राज ठाकरेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
मुंबईतील शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. "महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्ष, दोन नंबरचा पक्ष शिवसेना आणि तीन नंबरचा पक्ष राष्ट्रवादी, असं असताना तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवतोय. मी महाराष्ट्राच्या राजकारांसोबतच देशाच्या राजकारणात असा प्रकार पाहिला नाही," असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला. आज महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. 


व्यासपीठावरुन एकमेकांना शिव्या, नंतर एकमेकांच्या मांडीवर 
शिवसेना आणि राष्ट्रवादीला लक्ष करत राज ठाकरे म्हणाले की, "व्यासपीठावरुन तुम्ही एकमेकांना शिव्या घालता, नंतर जाऊन तुम्ही एकमेकांच्या मांडीवर बसता." शिवसेना-भाजप युती तुटली यावर बोलताना ते म्हणाले की, "अडीच वर्षाचं कारण सांगत युती तोडली. या तुमच्या आपसातल्या गोष्टी आहे, याच्याशी आमचा काय संबंध? ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केलं ते भाजप-शिवसेना युती म्हणून केलं. शरद पवार आणि काँग्रेससोबत जाण्यासाठी म्हणून केलं नव्हतं. या मतदारांशी गद्दारी करणाऱ्याला कोणती शिक्षा देणार?"


संबंधित बातम्या