Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह (Marathwada Rain Update)  राज्यातील काही भागात तुफान पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. काही ठिकाणी पिकं सडली आहेत तर सोयाबीन जागेवरच उगवत असल्याचं देखील समोर आलं आहे. या नुकसानीमुळं शेतकरी हवालदिल झाला असून सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे. 


शेतकरी संकटात! राज ठाकरे म्हणाले, ही आणीबाणीची वेळ, ओला दुष्काळ जाहीर करा


राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह राज्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ओला दुष्काळासंदर्भात महत्वाचं भाष्य केलं आहे. वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की,  शेतकरी संकटात सापडल्यावर राज्य आणि केंद्र सरकार दोघांनीही मदतीची भूमिका घ्यायची असते.  यंदा प्रचंड पाऊस, वादळ आणि महापूरामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. राज्यात ओला दुष्काळ काही जिल्ह्यात जाहीर करायचा का याबाबत विचार सुरु आहे. नुकसानग्रस्त जिल्ह्यातील माहिती गोळा झाल्यावर ओला दुष्काळाबाबत निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले. 


Maharashtra Rain : आभाळ फाटलं! 'गुलाब' वादळाचे 'काटे' शेतकऱ्यांच्या अंगाला, बळीराजाचं अतोनात नुकसान


वडेट्टीवार म्हणाले की,  मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आकडा मोठा आहे, तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.  मराठवाड्यातील 80 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. पाऊस ओसरला की 100 टक्के पंचनामे पूर्ण होतील. राज्य सरकारकडून NDRF च्या निकषाप्रमाणे मदत होईल, असंही ते म्हणाले. 


पावसामुळं मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची 'सीईटी' पाण्यात!, शेकडो विद्यार्थ्यांना फटका, पुन्हा परीक्षा घेणार असल्याची CET सेलची माहिती


त्यांनी म्हटलं की,  शेतकरी संकटात आला की सर्वच पक्षांची शेतकऱ्यांना मदतीची मागणी असते.   मराठवाड्यात 17 लाख हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीची माहिती आहे. यापेक्षा जास्त नुकसान असू शकतं. कापूस, सोयाबीनचं मोठं नुकसान झालं आहे, असंही त्यांनी सांगितलं.   शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्ज काढण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील, असंही ते म्हणाले.