अहमदनगर : खर्ड्यातील नितीन आगेच्या हत्या प्रकरणी 9 जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यात येणार असल्याची माहिती सरकारी वकील रामदास गवळी यांनी दिली. शिवाय, खटल्यातील 13 फितुरांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही गवळी यांनी सांगितले.


"नितीन आगेच्या हत्या प्रकरणी 9 जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यात येणार असून, या प्रकरणी शनिवारी अपिलासाठी औरंगाबाद लॉ अॅण्ड ज्यूडिशियल विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. अहवालानुसार 60 दिवसात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.", असे सरकारी वकील रामदास गवळी यांनी सांगितले. त्याचबरोबर 13 फितुरांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, न्यायालयीन कागदपत्रं जमा झाल्यावर कारवाईची प्रक्रिया सुरु होणार असल्याचं गवळी यांनी सांगितलं.

नितीन आगेच्या हत्या प्रकरणी एकूण 26 साक्षीदार तपासले होते, तर  164 कलमानुसार 8 साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. मात्र, 13 साक्षीदार फितूर झाले आहेत. शिक्षक बाळू गोरे, रमेश काळे आणि साधना फडतरे आणि शिपाई विष्णू जोरे यांच्यासह 13 जण फितूर झाले. तर नितीनचे आई, वडील, दोन बहीण आणि  पंचनामा करणारे तपास अधिकारी आणि शवविच्छेदन अधिकारी हे सरकारच्या बाजूनं राहिले आहेत.

शवविच्छेदन अहवालात गळा दाबून हत्या झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या खटल्यात साक्षीदारांवर कोणताही दबाव नव्हता. साक्षीदारांनी सरकारी पक्षाला दबाव नसल्याचं सांगितलं. त्याचबरोबर या प्रकरणी  कोणताही अर्ज नसल्याचं गवळी यांनी सांगितलं. त्यामुळं फितुरांवर कायदेशीर करण्यात येणार असल्याची माहिती गवळी यांनी दिली.

नितीन आगे हत्या प्रकरण काय आहे?

28 एप्रिल 2014 रोजी जामखेड तालुक्यातील खर्डा गावात नितीन राजू आगेची हत्या झाली होती. नितीन न्यू इंग्लिश स्कूलमधे बारावीला शिकत होता. प्रेमप्रकरणाच्या वादातून नितीनला आरोपींनी शाळेत मारहाण केली होती. मारहाण करतच आरोपींच्या विटभट्टीवर नेऊन बेदम मारहाण केली. त्यानंतर  लिंबाच्या झाडाला नितीनला गळफास दिला होता.

या प्रकरणी सचिन गोलेकरसह 13 जणांवर गुन्हा दाखल झाला. यापैकी 3 अल्पवयीन होते, तर एकाचा सुनावणी दरम्यान मृत्यू झाला होता. हत्येनंतर राज्यात दलित संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. या घटनेने राज्य ढवळून निघालं होतं.  त्यानंतर नोव्हेंबर 2016 पासून सुनावणीला सुरुवात झाली. या दरम्यान 26 साक्षीदार तपासले. यापैकी 14 साक्षीदार फितूर झाले होते.

या खटल्यात  नितीनचे वडिल राजू आणि आईचीही साक्ष नोंदवली. आरोपींविरुध्द पुरावे सिद्ध न झाल्याने सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोष ठरवलं. सामाजिक संघटना आणि दलित संघटनांनी आवाज उठवला होता.