waterways News : देशात जल वाहतुकीला (waterways) प्रोत्साहन देण्यासाठी 24 राज्यांमधील 111 जलमार्गांना राष्ट्रीय जलमार्ग म्हणून घोषित करण्यात आलं आहे. राष्ट्रीय जलमार्ग कायदा, 2016 (National Waterways Act 2016) अंतर्गत ही घोषणा करण्यात आली आहे. महत्त्वाच्या यामध्ये महाराष्ट्रातील चार जलमार्गांचा समावेश करण्यात आला आहे. या जलमार्गांच्या तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता आणि विस्तृत प्रकल्प अहवालाच्या निष्कर्षांच्या आधारे ही घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, 26 राष्ट्रीय जलमार्गांसाठी भारतीय अंन्तर्देशीय जलमार्ग प्राधिकरणानं कृती आराखडा तयार केला आहे. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.


महाराष्ट्रातील चार जलमार्गांचा समावेश


राष्ट्रीय जलमार्ग म्हणून घोषित करण्यात आलेल्या 111 जलमार्गांपैकी महाराष्ट्रातील चार जलमार्गांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. यामध्ये अंबा नदी (राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 10), दाभोळ खाडी वसिष्ठी नदी (जलमार्ग क्रमांक 28) आणि महाराष्ट्र , गुजरातला जोडणाऱ्या नर्मदा नदी (जलमार्ग क्रमांक 73) आणि तापी नदी (जलमार्ग क्रमांक 100) यांचा समावेश करण्यात आला आहे. 26 व्यवहार्य जलमार्गांपैकी पहिल्या 13 जलमार्गांसाठी विकासकामं सुरु करण्यात आली आहेत.


जलमार्गांच्या विकासासाठी प्रयत्न


याशिवाय, सिक्कीमसह ईशान्य राज्यांमध्ये अंतर्देशीय जलमार्गांच्या विकासासाठी केंद्रीय क्षेत्र योजना नावाची योजना आहे. ज्यामध्ये ईशान्येकडील  राज्यांना 100 टक्के आर्थिक सहाय्य दिले जाते. राष्ट्रीय जलमार्गांच्या विकासासाठी मंजूर निधीचा तपशील देण्यात आला आहे. भारतीय अन्तर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय जलमार्ग -1 हल्दिया ते वाराणसी - 1 हजार 390 किमीच्या क्षमता वाढीसाठी जलमार्ग विकास प्रकल्प हाती घेतला आहे. जागतिक बँक तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य पुरवत आहे.  4 हजार 633.84 कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजित खर्चाने 1 हजार 500  ते 2000 डेड वेट टनेज  पर्यंतच्या जहाजांसाठी वर्षातील किमान 330 दिवस 2.2 ते 3.0 मीटरची किमान उपलब्ध खोली आणि तळाशी  45 मीटर रुंदी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: