उस्मानाबाद : टाटा विद्युत प्रकल्पासाठी दिला जाणारा पाणी पुरवठा दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातल्या सहा धरणातून दिला जाणारा पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येईल.


निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची, यासाठी नऊ सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. सध्या टाटा विद्युत प्रकल्पाला लोणावळा, वलवण, शिरवटा, सोमवाडी, ठोकरवाडी आणि मुळशी या सहा धरणातून पाणीपुरवठा होतो.

तुटीच्या भीमा खोऱ्यातील हे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्याचा निर्णय घेण्यात आला. या पाण्याचा पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यासाठी फायदा होईल.

दरवर्षी या धरणातून टाटाला 43 टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी दिलं जातं. रायगड जिल्ह्यातल्या खोपोली, भिरा, भिवपुरी इथल्या टाटाच्या वीजनिर्मिती प्रकल्पासाठी पाणी दिलं जातं. तीन वीज निर्मिती प्रकल्पातून 447 मेगावॅट विजेचे उत्पादन करुन साडेचार लाख मुंबईकरांना वीजपुरवठा होतो.

19 व्या शतकात टाटांनी ब्रिटिशांसोबत करार करुन ही सहा धरणं बांधली होती. सुमारे नव्वद वर्षांपासून टाटाच्या वीज निर्मितीसाठी हे पाणी वापरलं जात आहे. मात्र तहहयात पाणी वापरण्याचा टाटांनी केलेला करार रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

कोयना धरणातून वीजनिर्मितीनंतर कोकणात वाहून जाणारं 68 टीएमसी पाणीही रोखण्यासाठी अभ्यास सुरु आहे.