मुंबई : महायुती सरकारमध्ये अनेक घोटाळे समोर येत असून, महायुती सरकारचा 8 हजार कोटीचा आणखी एक महाघोटाळा (Scam) पुढे आला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. केवळ सात दिवसांच्या शॉर्ट नोटीसवर टेंडर काढून रुग्णवाहिका (Ambulance) खरेदीचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. 4 हजार कोटीमध्ये जे काम होवू शकत होते, त्या कामासाठी 8 हजार कोटीचा खर्च करण्यामागचं कारण काय? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. 


याबाबत ट्वीट वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, "मंत्रिमंडळ बैठकीत 2 जुलै रोजी टेंडर काढण्याचा निर्णय झाला. 4 ऑगस्ट 2023 रोजी टेंडर काढण्याचा अध्यादेश निघाला. पहिले टेंडर सप्टेंबर 2023 ला निघाले आणि त्याची मुदत 21 दिवस होती. पुढे हे  टेंडर रद्द करण्यात आले. पहिल्याच टेंडरवर दुसरे टेंडर 4 जानेवारी 2024  निघाले आणि त्याची मुदत 7 दिवस होती. तर, याबाबत प्री-बिड मीटिंग घेतलेली नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. 


मर्जीतील माणसासाठी सात दिवसांत टेंडर 


राज्यात घोटाळ्यावर घोटाळे पुढे येत आहे. मर्जीतील माणसांना कोट्यावधीची काम देण्यासाठी, वाटेल ती शक्कल लढवली जात आहे. भ्रष्टाचाराचा कळस गाठण्याचा काम या सरकारमध्ये सुरू आहे. काल केवळ सात दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर 108 रुग्णवाहिकांचा आठ हजार कोटीचा टेंडर काढण्यात आला. फक्त सात दिवसात हा टेंडर काढला गेला. रुग्णवाहिकेचा कोणताही टेंडर तीन वर्षांपेक्षा जास्त नसतो, मात्र हे टेंडर 10 वर्षांसाठी काढण्यात आला आहे. कसल्याही पद्धतीने याची चौकशी केल्यावर हे टेंडर फक्त 4 हजार कोटींचं आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या मंत्र्यासह आयएएस अधिकाऱ्याला बदलीचा धाक देऊन केवळ सात दिवसांची मुदत देऊन, आठ हजार कोटींचा टेंडर मर्जीतील माणसासाठी काढण्यात आला. यातून चार हजार कोटींची कमाई होणार असल्याने हा टेंडर काढला गेला. यातून जनतेच्या पैशांची लूट केली जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. 


मंत्र्याच्या जवळच्या नातेवाईकाला टेंडर मिळणार...


कर्ज काढल्याने तिजोरीत पैसे नसल्याने हे राज्य आधीच बरबाद झालं आहे. अशा परिस्थितीत  रुग्णवाहिकेचा 8 हजार कोटीचा महाघोटाळा करण्यात आला आहे. आरोग्य खातचं भ्रष्टाचारामध्ये बुडाला आहे. कुठल्याही अभ्यासाकाला बसवा माझा दावा आहे हे काम 4 हजार कोटीचे आहे. 4 हजार कोटीच्या कामासाठी 8 हजार कोटी मोजण्यात आले. मंत्र्याच्या जवळच्या नातेवाईकाने हे काम मिळवून मंत्र्याची पार्टनरशिप यामध्ये आहे. हे राज्य उध्वस्त करण्याचं काम सुरू आहे. राज्याची तिजोरी लुटली जात आहे. घोटाळेबाज सरकारने राज्याला अधोगतीकडे नेण्याचं काम सुरू केले आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. 




मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार...


आठ हजार कोटीचं टेंडर फक्त सात दिवसात कोणी काढतं का?,थोडी लाज देखील हवी. जेव्हा हे टेंडर खुले होईल, त्यावेळी ज्याला हे काम मिळेल तो मंत्र्यांचा नातेवाईक असेल हे मी सांगतो. या सर्व प्रकरणात मी तक्रार करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मी हे टेंडर थांबवण्यासाठी विनंती करणार आहे. मात्र, सगळेच चोरचोर मावस भाऊ असे मिळून असतील, तर रद्द करणार नाही. एका विशिष्ट कंपनीला टेंडर देण्यासाठी हे सगळे प्रयत्न करण्यात आल्याचे देखील, वडेट्टीवार म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


दहा लाखात तलाठी व्हा! पेपरफुटी प्रकरणी विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप