मुंबई : अवकाळी पावसासारख्या अस्मानी संकटावर मात करुन पिकवलेल्या फळबागा हातातोंडाशी आलेल्या असताना बुधवारी राज्यातील काही जिल्ह्यात गारपीट झाली. त्यामुळे अवकाळी पावसाने निर्यातक्षम द्राक्ष, डाळींब, केळी बागांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील सांगली, जळगाव, वाशिम, हिंगोली, धुळे, यवतमाळसह अन्य काही जिल्ह्यांमध्येही अवकाळी पावसासह गारपीट झाली. परिणामी हवेत काहीसा गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. तर, देशात आलेल्या कोरोना व्हायरसमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे सध्या निर्यातबंदी करण्यात आलीय. त्यामुळे अनेक बाजारसमीत्यांमध्ये शेतीमाल पडून आहे.


सांगली जिल्ह्यातील खानापूर परिसरात गेल्या पाच ते सात वर्षांपासून अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. मात्र, अवकाळी पावसात गारा पडण्याचे प्रमाण या दोन ते तीन वर्षांत वाढले आहे. द्राक्ष काढणी हंगाम आणि अवकाळी पाऊस हे समीकरण बनल्याचे चित्र या पावसामुळे बनले आहे. बुधवारी सायंकाळी झालेल्या पावसात खानापूर, बेणापूर, हिवरे, सुलतानगादे परिसरात हलकी गारपीट झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्याचा तडाखा खानापूर घाटमाथ्यावरील द्राक्षबागा, गहू, हरभरा तसेच भाजीपाला पिकांना बसला आहे.

मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पावसाचा तडाखा; गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान

द्राक्षांवर रोग पडण्याची शक्यता
खानापूर घाटमाथ्यावर सध्या द्राक्ष हंगाम जोरात सुरू आहे. निर्यातक्षम द्राक्षांसह स्थानिक बाजारपेठेसाठीच्या द्राक्षांची काढणी सुरू आहे. सध्या हा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून शेकडो एकर द्राक्षे निर्यात होणार आहेत. मात्र, या अवकाळी पावसामुळे द्राक्ष घडात पाणी साठून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ज्या द्राक्ष घडामध्ये साखर आली आहे, अशा बागांची काढणी होणार होती. त्यांची साखर कमी झाल्याने काढणी पुन्हा साखर येईपर्यंत पुढे ढकलली जाणार आहे. द्राक्ष हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात खानापूर, बलवडी, पळशी, हिवरे, मोही, गोरेवाडी, बेनापूर, सुलतानगादे या गावातील निर्यातक्षम द्राक्षांची काढणी झाली नसून या बागांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तर, वाशिम जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसासह झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांसह मुक्या जनावरांना ही मोठा फटका बसल्याचं चित्र समोर आलंय. या गारपीटीचा फटका वाशिम बाजारसमिती समोर असलेल्या पिंपळाच्या वृक्षावर वास्तव करणाऱ्या पोपटांना बसला. या गारपीटीत शेकडो पोपटांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक पक्षी जखमी झाल्याचं पाहायला मिळालं.

अवकाळी पावसाचे विधानसभेत पडसाद; देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले...

हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस
जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी, वसमत, औंढा, हिंगोली या पाचही तालुक्यामध्ये अवकाळी पावसात सोबतच गारांचा पाऊस पडला. यामध्ये शेतातील, गहू, हरभरा, भाजीपाला यासह बागायत संत्रा, मोसंबीला मोठया प्रमाणात फटका बसला आहे. दहा वाजता अचानक झालेल्या गारपीटीने सर्व जिल्ह्याला झोडपून काढलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी अवकाळीमुळे संकटात सापडला आहे. कापून ठेवलेले गहू, हरभरा, तसेच उकळून ठेवलेली हळद झाकण्यासाठी मध्यरात्रीच धांदळ उडाली. अचानक पावसाला सुरुवात झाल्याने घराकडे परतण्याच्या गडबडीमध्ये अनेक ठिकाणी अपघात घडण्याच्या घटना घडल्या. तसेच काही गावातील विद्युत तारा तुटल्याने जिल्ह्यातील अनेक गावांना रात्र अंधारातच जागून काढावी लागली. तर, बीड जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने रब्बी पिकाचे मोठं नुकसान झालय. अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने हरभरा, गहू आणि ज्वारी काढण्याच्या कामाचा विचका झाला. अंबाजोगाई तालुक्यातल्या आपेगाव परिसरामध्ये मोठे नुकसान झाले आहे.

Coronavirus Update | मुंबई, पिंपरी, रत्नागिरीत तीन रुग्ण आढळले, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 45 वर

जळगाव जिल्ह्यात फळबागांना फटका
जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात आज पुन्हा गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील चाळीसगाव भडगाव तालुक्यातील जुवार्डी, आडळसे, पोहरे दंस्केबर्डी, नावरे, बहाळचा काही भाग याठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. यात लिंबू बागा अक्षरशः मोडून पडल्या आहेत. गुढे परिसरात सर्वाधिक लिंबूचे उत्पादन घेतलं जातं. यात यावर्षी जास्त प्रमाणात झालेला पाऊस त्यामुळे लिंबू बागांना फटका बसला होता. त्यातच आज गारपीटीने अधिक भर पाडून शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याबरोबर गहू, हरभरा, मका, ज्वारी, बाजरी, भाजीपाला मातीमोल झाला आहे. गुढ्यात पावसापेक्षा गाराच जास्त पडत होत्या. शासनाने प्रत्यक्ष पाहणी करून लवकरात लवकर पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Rain in Maharashtra | राज्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट, पीकांचं मोठं नुकसान