मुंबई : राज्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे बुडत्याचा पाय खोलात, अशी अवस्था शेतकऱ्याची झालीय. याचा परिणाम विधानसभेतही पाहायला मिळाला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी केलीय. तर, ऑक्टबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचे पैसे दिले नाही. आता हे सरकार काय देणार? असा प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना घेरण्याच प्रयत्न केला.


पिकांच्या ऐन मोसमात अवकाळी पावसानं चांगलाच तडाखा दिलाय. रविवारी सोलापूरसह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळं ज्वारीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर नाशिकच्या नांदगावमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागात गारपीठही झालीय. त्यामुळं उघड्यावर असलेला कांदा भिजल्यानं शेतकऱ्यांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. तर, आज सकाळी पुन्हा लातूर, परभणीत पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याचं पडसाद आज विधानसभेत पाहायला मिळाले.

Unseasonal rain | मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचा तडाखा; ज्वारी, हरभरा, गव्हाचं मोठं नुकसान

याबाबत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आज सभागृहात निवेदन देण्याची शक्यता आहे. शनिवार, रविवारी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. काही ठिकाणी गारपीटही झाली. याबाबत पंचनामे करण्याच्या सूचना दिल्याची माहिती कृषि मंत्री दादा भुसे यांनी दिली. सोबतच शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील, असं आश्वसनही त्यांनी दिले. पंचनाम्याचा अहवाल आल्यावर नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असंही त्यांनी सांगितले.

आता हे सरकार काय देणार? : चंद्रकांत पाटील
ऑक्टबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. त्यामुळे आता हे सरकार काय देणार? अशी टीका भाजपचे प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. जर, हे शेतकऱ्यांचे कैवारी असतील तर शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन त्यांना मदत करतील, असं आव्हानही पाटील यांनी ठाकरे सरकारला केलंय.

शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्यात येईल : उपमुख्यमंत्री
राज्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचं काम सुरू असून मदतीचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना कशी मदत करता येईल याबाबत सभागृहात आणि मंत्रीमंडळात चर्चा होऊन निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय.

IMD Prediction on Monsoon | देशातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी, यंदा पाऊस चांगला बरसणार : आयएमडी