मुंबई : कोकणात राजकीय घडामोडींना वेग आला असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नारायण राणेंना ताब्यात घेतल्यानंतर आता कोर्टामध्ये कसं हजर करायचं याचीही कायदेशीर माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे. संगमेश्वरमधून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पेलिसांनी अटक केले आहे. 


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नारायण राणे यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. 


नारायण राणेंना अटक करण्यापूर्वी रत्नागिरी पोलीस अधिक्षकांनी सुमारे तासभर नारायण राणेशी चर्चा केली. त्यावेळी नितेश राणे, प्रसाद लाड आणि इतर भाजप नेते या ठिकाणी उपस्थित होते. 


नारायण राणेंना अटक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनआशीर्वाद यात्रेला महाराष्ट्रात अटकाव केल्याचा संदेश जाणार आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध नारायण राणे या नंतर आता शिवसेना विरुध्द पंतप्रधान मोदी असा दुसरा अंक सुरु होणार आहे. 


नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले आहेत. सध्या नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. कालच्या राणे यांच्या वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात नाशिक, पुणे आणि महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


दरम्यान नारायण राणेंना अटक झाल्यास राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा भाजपच्या वतीनं देण्यात आला होता. नारायण राणेंच्या अटकेमुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही, पण ज्या पद्धतीने सरकारकडून पोलिसांचा गैरवापर सुरु आहे ते पाहता आम्ही राणे साहेबांच्या मागे संपूर्ण पक्ष म्हणून भक्कमपणे उभे आहोत असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले


संबंधित बातम्या :


Narayan Rane VS Shiv Sena Row | नारायण राणेंच्या वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद


केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रकरणावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..