Amit Shah In Kolhapur : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मेळाव्यांवर मेळावे घेतले जात आहेत. त्याचं अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे आज (25 सप्टेंबर) कोल्हापूरमध्ये (Kolhapur) येत आहेत. त्यांच्या दौऱ्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा कसबा बावड्यातील महासैनिक दरबार हॉलमध्ये पार पडणार आहे. या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे. अशातच आज गृहमंत्री अमित शाह हे करवीरनगरीत येत असले तरी ते कोल्हापुरातील महालक्ष्मीचे दर्शन घेणार नसल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच ते शेंडा पार्क येथील अकराशे बेडच्या नवीन इमारतीच भूमिपूजन आणि जिल्हा बँकेचे नवीन इमारतीचं उद्घाटनसाठी येणार होते, मात्र या दौऱ्यात हा कार्यक्रम देखील पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिली आहे.


सर्व कार्यक्रम ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात- हसन मुश्रीफ


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत, त्यासाठी ते आज कोल्हापुरात येत आहेत. मात्र या दौऱ्यात ते आज महालक्ष्मीचे दर्शन घेणार नाहीत. तर ते ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात परत कोल्हापुरात आले की दर्शन घेणार आहेत. तसेच जिल्ह्यातील शेंडा पार्क येथील अकराशे बेडच्या नवीन इमारतीच भूमिपूजन आणि जिल्हा बँकेचे नवीन इमारतीचं उद्घाटनासाठी देखील ते आज येणार होते, मात्र पितृ पंधरवडा असल्याने तेही होणार नसल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी अमित शाह यांच्या सासुरवाडीची आहे. महालक्ष्मी हे तिरुपतीहून आपल्याकडे आली आहे. मी तिरुपतीला गेलो त्यावेळी तेथील लोक मला म्हणत होते आमची महालक्ष्मी तुमच्याकडे गेलेली आहे. यामुळे सर्व कार्यक्रम ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याचेही हसन मुश्रीफ म्हणाले. 


लाडकी बहीण योजनेमुळे लोकमतात मोठी वाढ  


लाडक्या बहिणी योजनेचे दोन महिन्याचे पैसे गेल्यानंतर वीस ते पंचवीस टक्के लोकमतामध्ये वाढ दिसून आली आहे. तर हे लोकमत 30% पर्यंत अजून वाढत जाईल असा विश्वासही मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलताना व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील कंत्राटदारांवरही भाष्य केलं. ते म्हणाले की, महाराष्ट्र हा देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे. शासनाचे पैसे द्यायला थोडेफार मागेपुढे होईल,  मात्र शासनाचे पैसे पोहोचायची जबाबदारी शासनाची आहे. शासन प्रसंगी कर्ज काढेल, मात्र कोणाचं पैसे थकवणार नाही.


हे ही वाचा