Amit Shah In Kolhapur : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मेळाव्यांवर मेळावे घेतले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (25 सप्टेंबर) कोल्हापूरमध्ये येत आहेत. त्यांच्या दौऱ्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा कसबा बावड्यातील महासैनिक दरबार हॉलमध्ये पार पडणार आहे. या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं असतानाच कोल्हापूरमध्ये भाजपच्या गळाला विद्यमान आमदार आहे. इचलकरंजीतील (Ichalkaranji Vidhan Sabha) अपक्ष आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी भाजपमध्ये निर्णय प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासह त्यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांचा सुद्धा भाजप प्रवेश होत आहे. 


माजी आमदार सुरेश हाळवणकर आता कोणती भूमिका घेणार?


प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना उमेदवारीसाठी सुद्धा शब्द घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे एक विद्यमान आमदार भाजपकडे आला आहे. प्रकाश आवाडे यांचा भाजप प्रवेश निश्चित होत असल्याने दुसरीकडे भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर आता कोणती भूमिका घेणार? याकडे सुद्धा लक्ष असेल. सुरेश हाळवणकर  प्रकाश आवाडे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यामुळे आवाडे यांचा भाजप प्रवेश होत असल्याने ते काय करणार याची सुद्धा चर्चा आहे.


दरम्यान, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून स्वतःच्या ताराराणी पक्षाकडून प्रकाश आवडे यांनी राहुल आवाडे यांना उमेदवारी जाहीर केली होती. इतकेच नव्हे तर त्यांनी हातणंगले मतदारसंघांमध्ये सुद्धा जयश्री कुरणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता प्रकाश आवाडे भाजपमध्ये येत असल्याने उमेदवारी कायम राहणार की उमेदवारी मागे घेतली जाणार? याकडे सुद्धा लक्ष असेल.


इचलकरंजी आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघांमध्ये डोकेदुखी कमी झाली 


आमदार प्रकाश आवाडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यांनी आपल्या मुलाला उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महायुतीची दोन मतदारसंघातील डोकेदुखी कमी झाली आहे का? याची सुद्धा चर्चा आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रकाश आवाडे यांनी आपण उमेदवारी मागायला कोणाकडे जाणार नसल्याचे म्हटले होते. उमेदवार ताराराणी पक्षाकडून उभे राहतील असं त्यांनी स्पष्ट केले होते. त्याचबरोबर त्यांनी चार ठिकाणी उमेदवार देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता प्रकाश आवाडे भाजपच्या गोटात सामील झाल्याने महायुतीची किमान इचलकरंजी आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघांमध्ये डोकेदुखी कमी झाल्याची चर्चा आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या