मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याच लाॅकडाऊन लागण्याची शक्यता असताना अत्यावश्यक सेवेत छत्री, रेनकोट आणि ताडपत्री व्यावसायिकांचा समावेश करण्यात आला आहे. पावसाळा सुरु होण्याआधी छत्री, रेनकोट आणि ताडपत्री विकणाऱ्या व्यापाऱ्यांचा सीजन फक्त दोन ते तीनच महिनेच असतो. त्यामुळे या व्यापाऱ्यांना अत्यावश्यक सेवेत समावेश करत दिलासा देण्यात आला आहे. भिवंडी आणि परिसरात व्यापाऱ्यांचे कारखाने सुरु आहेत. उत्पादन होत असताना माल विकायचा कुठे असा प्रश्न या व्यापाऱ्यांसमोर निर्माण झाला होता. आज व्यापारी वर्गाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यात आली आणि त्यानंतर उपमुख्यमंत्रांकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. व्यापारी वर्ग, कामगार वर्गाकडून राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले आहे. 


मोठ्या प्रमाणात माथाडी कामगारांचेही पोट मुंबईतील छत्री बाजारावर भरत असते. या बाजारात जवळपास 400 दुकाने आहेत. ह्यातील काही दुकानांमध्ये छत्री, रेनकोटचा ठोक माल विकल्या जातो. ज्यात हा व्यवसाय चांगल्या प्रमाणात तीन ते चार महिनेच होत असतो. त्यामुळे जर आता पुन्हा यावर्षी लॉकडाऊनची झळ व्यापाऱ्यांना बसली असती तर मोठं नुकसान झालं असतं असं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे व्यावसायाचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश झाल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे. 


कोरोनापासून बचावात्मक उपाय म्हणून छत्रीचा वापर होऊ शकेल : व्यापारी


व्यापाऱ्यांकडून मास्कसोबतच छत्र्यादेखील ठेवणं बंधनकारक करावं अशी मागणी करण्यात आली आहे. ज्यात पावसाळ्यात कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचायचं असेल तर छत्र्यांच्या वापर करायला हवा. सोबतच नागरिकांकडून छत्रांचा वापर झाला तर सोशल डिस्टन्सिंग तसंच मेनटेन होईल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी छत्र्या आम्ही ना नफा, ना तोटा तत्वावर देण्यास तयार असल्याचं दिनेश लुनिया यांनी सांगितलं. पावसापासून जसं बचावात्मक उपायसाठी आपण छत्र्यांचा वापर करतो तसंच कोरोनाला रोखण्यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो अशी कल्पना व्यापाऱ्यांकडून सुचवण्यात आली आहे.