पंढरपूर :  निवडणूक सरकार बनविण्याची नसल्याची वक्तव्याचा समाचार घेताना तुम्ही भाजप उमेदवार समाधान अवताडे यांना 2 मे रोजी विजयी करून इथला कार्यक्रम करा मी सरकारचा संपूर्ण कार्यक्रम करतो असे वक्तव्य करीत देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा सत्ताबदलाचे संकेत दिले . भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्यासाठी आज फडणवीस यांनी मंगळवेढा आणि पंढरपूर मध्ये सात सभा घेत धडाका उडवून दिला. या आधीच्या दोन सभातही सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा असे वक्तव्य त्यांनी केले होते.  मात्र या सर्वच सभांच्या गर्दीत कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत होते . 


पहिली सभा मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे झाली. त्यानंतर नंदेश्वर , डोंगरगाव आणि मंगळवेढा शहरात मोठ्या सभा झाल्या . यानंतर अवताडे यांच्या निवासस्थानी भोजन घेऊन फडणवीस यांनी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव आणि गाडेगावात सभा घेऊन शेवटची सभा पंढरपूर शहरातील टिळक स्मारक मैदानावर घेण्यात आली . येथे सभा काळात सातत्याने सोसाट्याचा वारा आणि पावसाची रिपरिप सुरु होती . फडणवीस यांनी यातच सभा घेत समाधान अवताडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले . या संपूर्ण दौऱ्यात भाजपनेही माजी मंत्री , खासदार आणि आमदारांची फौजच प्रचारात उतरवली होती . 


 आपणास या कोरोना काळात मोठ्या दोन सभा घेता आल्या असत्या मात्र कोरोना काळामुळे गर्दी टाळण्यासाठी या लहान लहान गावासह 7 सभा घेतल्याचे तोकडे समर्थन फडणवीस यांनी केले. आम्ही प्रचारसभा घेणार नव्हतो मात्र राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार , जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी उधळलेल्या मुक्ताफळांसाठी मला सभा घ्याव्या लागल्या असे सांगत आम्ही सभेला आल्यानं मास्क वाटप केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच राज्यातील कोरोनाची गंभीर स्थिती पाहता ही निवडणूक आत्ता होणे योग्य नव्हते मात्र निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आणि राष्ट्रवादीचे नेते गल्ली बोलत प्रचार करीत फिरू लागल्याने आम्ही प्रचार करू लागल्याचेही फडणवीस यांनी सांगितले .
 
या निवडणुकीत फडणवीस यांनी आघाडी सरकारवर घणाघात करताना या सरकारमुळे ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थातील आरक्षण रद्द झाल्याचे सांगत सर्वोच्य न्यायालयाने मागणी करूनही यांनी कमिशन न नेमल्याने आता या उत्तरं मागासवर्गीय समाजाचा आरक्षणावर निवडणूक लढविण्याचा अधिकार गमवावा लागल्याची टीका केली . मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांच्या पाणी प्रश्नावर गेल्या तीन निवडणूक यांनी जिंकल्या पण पाण्याचा थेंबही आला नाही असे सांगत आता केंद्राकडून निधी आणून येत्या साडेतीन वर्षात या 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा विश्वास फडणवीस यांनी दिला.


संबंधित बातम्या :


Pandharpur By-election : पंढरपुरात प्रचारसभांचा जोर अन् कोरोना रुग्णवाढही जोरात!