Konkan Refinery : सध्या कोकणातील रिफायनरी प्रकल्पाचा विषय मागे सरला आहे. पण,  निवडणुकीच्या (Election 2024) तोंडावर या भागातील स्थानिक काय भूमिका घेणार हे तितकंच महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली. यावेळी चर्चेदरम्यान, कोकणातील रिफायनरी प्रकल्प आणि ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका याबाबत देखील चर्चा झाली. चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरेंनी राजापूर तालुक्यातील बारसू या ठिकाणी प्रकल्प करण्यासाठी केंद्राकडून सातत्यानं पाठपुरावा सुरू होता. प्रकल्प चांगला आहे. राज्याला त्याचा फायदा होईल, अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे या प्रकल्पासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतला होता. शिवाय, स्थानिक आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी प्रकल्पाचे समर्थन करावे यासाठी त्यांना पक्षाकडूनच आदेश दिले गेले होते, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी या चर्चेवेळी दिली. 


रिफायनरीचं समर्थन केल्यामुळे स्थानिक आमदार राजन साळवींना (Rajan Salvi) मोठ्या रोषाचा सामना करावा लागला होता. उद्धव ठाकरेंनी रिफायनरी विरोधकांची भेट घेतली त्यावेळी त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली गेली होती. शिवाय, साळवींची भूमिका पाहता त्यांच्याविरोधात रोष देखील दिसून येत होता. पण, आता साळवी यांना पक्षानेच आदेश दिल्याची बाब स्पष्ट झाली आहे.


साळवींना बदललेल्या भूमिकेमागील कारण उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं


नाणार या ठिकाणी असलेली रिफायनरी रद्द झाली. त्यानंतर बारसूमध्ये रिफायनरी होणार, अशी चर्चा होती. त्याचदरम्यान उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेलं पत्र देखील समोर आलं. या सर्व घडामोडी घडत असताना स्थानिक आमदार राजन साळवींनी रिफायनरी समर्थनार्थ विधानं केली. परिणामी त्यांच्याविरोधात रिफायनरी प्रस्तावित असलेल्या गावांमध्ये रोष दिसून आला. आंदोलनादरम्यान साळवींचा पुतळा देखील जाळण्याचा प्रयत्न झाला. शिवाय, त्यांची प्रतिकात्मक प्रेत यात्रा देखील काढली गेली. रिफायनरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणानंतर उद्धव ठाकरेंनी या भागाचा दौरा केला. त्यावेळी सोलगाव फाट्यावर त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. पण, साळवींना बदललेल्या भूमिकेमागील कारण आता थेट उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. 


माती परिक्षणाचं काय झालं? 


रिफायनरीसाठी जागा निश्चित करत असताना बारसुच्या सड्यावर माती परिक्षण केलं गेलं. त्यावेळी मोठ्ठं आंदोलन झालं. शिवाय, याच आंदोलनाला हिंसक वळण देखील लागलं. पण, अद्याप तरी माती परिक्षणाचा अहवाल समोर आलेला नाही. त्यामुळे रिफायनरीचं भवितव्य नेमतं काय? असा सवाल आता निर्माण झाला आहे. 


हे ही वाचा