Raigad News Update : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात विचित्र अपघात झाला आहे. भरधाव कंटेनरने रस्त्यावरील चार कार गाड्यांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून पाच ते सहा प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

  


मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारच्या सुमारास मुंबईकडे येणाऱ्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनरने पुढे जाणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर या भरधाव कंटेनरने काही अंतरावर असलेल्या दुसऱ्या कारला धडक दिली. त्यामुळे दुसऱ्या कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या मधोमध असलेल्या मिडियन गार्डनमध्ये शिरली. त्यानंतर कंटेनरने पुढे आणखी दोन कारला धडक दिली. त्यामुळे एक कार पलटी झाली. 


चार कारला धडक दिल्यानंतर पुढे जाऊन शंभर मीटर अंतरावर कंटेनर पलटी झाला. या विचित्र अपघातात कंटेनरमधील दोघांचा मृत्यू झाला तर इतर सहा जण जखमी झाले आहेत.  


 या अपघातात चारही कार गाड्यांमधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. तर पुण्यातील रोसे-पारडे येथील अनिता सिंग ( वय 54 ) या गंभीर जखमी झाल्या असून अखिलेश सिंग ( वय 55) हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


दरम्यान, या विचित्र अपघातानंतर काही काळ महामार्गावर बघ्यांची गर्दी झाली होती. काही स्थानिकांच्या मदतीने जघमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्वच जखमींची प्रकृती स्थिर आहे. 


महत्वाच्या बातम्या