Hingoli: हिंगोलीच्या वसमत तालुक्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र उभारली जाणार आहे. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला असून 100 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. यावरून शंभर एकर जमिनीवर हे संशोधन केंद्र उभारले जाणार असल्याची माहिती आहे


भारतात प्रथम क्रमांकाची गुणवत्ता असणारी हळद हिंगोलीच्या वसमत तालुक्यांमध्ये उत्पादित केली जाते. सांगलीनंतर सर्वात मोठं हळदीचे मार्केट हे वसमतमध्ये आहे. वसमतमध्ये बाराही महिने हळदीची विक्री केली जाते. परंतु या हळदीवर संशोधन करणारा केंद्र उभारलं जावं, अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून होती. या शिवसेना खासदार हेमंत पाटील त्याच बरोबर वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत नवघरे यांनी ही मागणी मंत्रिमंडळात लावून धरली. याविषयी कृषी मंत्री सोबत बैठक घेऊन यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विनंती केली.


या संशोधन केंद्रामुळे हळद उत्पादक शेतकऱ्याला मोठा फायदा होणार असल्याचं निष्पन्न झालं आणि त्यातूनच हळद संशोधन केंद्र निर्माण करण्यासाठी पुढील पावले उचलली गेली. त्यासाठी काहीच दिवसांपूर्वी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र या नावाने मंजुरी देत शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. हे हळद संशोधन केंद्र हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यांमध्ये उभारला जाणार आहे.


या हळद संशोधन केंद्र मुळे हळद उत्पादनामध्ये मोठी वाढ होणार आहे. हळदीवर प्रक्रिया शेतामधून उत्पादित घेतलेली हळद नवनवीन विकसित उपक्रमांच्या माध्यमातून शिजवणे वाळवणे. यासह हळदीला पॉलिश प्रक्रिया करण्यासाठी अद्यायावत प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर टिशू कल्चरच्या माध्यमातून रोपनिर्मिती करून अत्यल्प दरामध्ये हळदीचे रोप शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.


या संशोधन केंद्रामध्ये अत्याधुनिक साहित्य सामग्रीचा वापर करून हळद कमीत कमी दोन वर्ष साठवून ठेवता येईल, अशा पद्धतीने हे संशोधन केंद्र विकसित केले जाणार आहे. या हळदीवर प्रक्रिया आणि संशोधन करण्यासाठी अद्यायावत आणि सर्व सुविधा समाविष्ट असलेली प्रयोग शाळा या संशोधन केंद्रामध्ये उभारली जाणार आहे 


दरम्यान, हिंगोली जिल्ह्यांमध्ये दिवसंदिवस हळद लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. यावर्षी अति प्रमाणात झालेल्या पावसामुळे हळदीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. आशा परिस्थितीत या कालावधीमध्ये हळद उत्पादक शेतकर्‍यांनी काय काळजी घ्यावी, काय खबरदारी घ्यायला हवी, कोणत्या उपाययोजना केल्यावर हळदीचे उत्पादन वाढणार आहे. यासह साठवणूक पासून ते हळद निर्यातीपर्यंत सर्व संशोधन या संशोधन केंद्रामध्ये केले जाणार आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या उभारणीमुळे हिंगोली जिल्ह्यातील हळदीचा पुनर्जन्म होणार आहे.