मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


विधानपरिषदेसाठी आज मतदान आणि निकाल
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे.  राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेतही धक्कादायक निकालाची परंपरा सुरू रहाणार का हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. एकूण 10 जागांसाठी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास आघाडी सावध झाली आहे. तर भाजपनं या निवडणुकीतही चमत्कार करून दाखवण्याचा विश्वास व्यक्त केलाय. या निवडणुकीतही 1996, 2010 सारखी विधान परिषदेच्या धक्कादायक निकालाची परंपरा पहायला मिळणार काय याची उत्सुकता दिसून येतेय. 
 
खरी लढत रंगणार भाजप विरूद्ध कॉग्रेस
विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्ये असल्याचं दिसून येतंय. काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप विधानपरिषद निवडणूकीच्या रिंगणात आहेत. विधानपरिषद निवडणुकीत मुख्य लढत भाई जगताप विरूद्ध प्रसाद लाड अशी रंगणार आहे. भाई जगताप मुंबई काँग्रेस अध्यक्ष असल्यानं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकरता ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार भाई जगताप असल्यानं त्यांची मदार प्रेफरन्शिअल व्होटिंग आणि अपक्षांवर आहे. काँग्रेस आमदारांचे संख्याबळ 44 आहे. पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरेंना जिंकण्याकरता 26 मते मिळू शकतील. मात्र भाई जगतापांना जिंकण्याकरता 8 मते कमी पडत आहेत. या 8 मतांकरता काँग्रेसची जुळवाजुळव सुरु आहे. शिवसेनेकडील अतिरिक्त मते काँग्रेसकडे वळवून घेण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थक असलेल्या अपक्ष आणि लहान पक्षांची मते काँग्रेसकडे वळवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
 
राज ठाकरे यांच्यावर आज शस्त्रक्रिया
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हीप बोनची शस्त्रक्रिया होणार आहे. कोरोनाचे डेड सेल्स आढळल्यामुळे मागच्या वेळी शस्त्रक्रिया पुढे ढकलली होती. राज ठाकरे शस्त्रक्रियेसाठी लिलावती रूग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावरची शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी यासाठी कार्यकर्त्यांकडून पूजा केली जात आहे.
 
राहुल गांधींची आज चौथ्यांदा ईडी चौकशी होणार
ईडीने समन्स पाठवल्यानंतर राहुल गांधी 13 जूनला पहिल्यांदा चौकशीला समोर गेले. त्यानंतर सलग तीन दिवस राहुल गांधीची चौकशी झाली. पहिल्या दिवशी 50 प्रश्न, दुसऱ्या दिवशी 36 प्रश्न आणि तिसऱ्या दिवशी साधारण 24 प्रश्न विचारल्याची माहिती आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरण 2012 मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात याचिका दाखल केली. दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावर असलेल्या हेराल्ड हाऊसच्या 2000 कोटी रुपयांच्या इमारतीवर कब्जा करण्यासाठी हे सर्व केल्याचा आरोप स्वामींनी केला. सर्वोच्च न्यायालयाने 2015 मध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांना या प्रकरणी लवकर सुनावणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 19 डिसेंबर 2015 रोजी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ट्रायल कोर्टाने जामीन मंजूर केला. 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने खटला रद्द करण्यास नकार दिला आणि सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस आणि सुमन दुबे यांना न्यायालयात हजर राहण्यापासून सूट दिली होती. आज राहुल गांधीच्या ईडी चौकशीच्या वेळी कॉग्रेस कार्यकर्ते देशभर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत.
 
कोकण रेल्वेचे विद्युतीकरण 100 टक्के पूर्ण....मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा
26 जानेवारी 1998 पासून डिझेलवर धावणाऱ्या कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पुर्ण झाले आहे. कोकण रेल्वेच्या 741 किमी मार्गावर आजपासून पुर्णपणे इलेक्ट्रिकल गाडी धावणार आहे. 22 फेब्रुवारी 2021 रोजी पहिल्यांदा रोहा ते रत्नागिरी असं वीजेवर चालणाऱ्या इंजिनाची यशस्वी चाचणी झाली. कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी 1287 कोटी रूपये खर्च आला आहे.
 
संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान
संत एकनाथ महाराजांची पालखी आज प्रस्थान ठेवणार आहे. सकाळी 11 वाजता नाथांच्या गावातील वाड्याकडून समाधी मंदिराकडे पालखी प्रस्थान करेल. सूर्यास्ताच्या वेळी पैठणकर पालखीला निरोप देतील.