एक्स्प्लोर
उघड्या वायरने घेतला तिघांचा जीव, वारसांना 4 लाखांची मदत; अजित पवारांकडून कारवाईचेही निर्देश
मुळ सोलापूर जिल्ह्यातील रहिवाशी असलेले भालेकर कुटुंब दापोडी (ता. दौंड) येथील सूर्यकांत महादेव अडसूळ यांचे घरी भाड्याने राहत होते

Ajit pawar on daund electricity
Source : file image
पुणे : जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील दापोडी येथे आज सोमवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, मयतांच्या वारसांना महावितरणमार्फत प्रत्येकी 4 लाखांची मदत दिली जाणार आहे. तर, याप्रकरणी दुर्घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबत माहिती दिली.
मुळ सोलापूर जिल्ह्यातील रहिवाशी असलेले भालेकर कुटुंब दापोडी (ता. दौंड) येथील सूर्यकांत महादेव अडसूळ यांचे घरी भाड्याने राहत होते. अडसूळ यांचे घराचे पाठीमागे मोकळ्या जागेत अंदाजे सहा फूट उंचीचे वीट बांधकाम व त्यावर साडेतीन फूट उंचीचे लोखंडी पत्र्याचे कंपाऊंड केलेले आहे. शेजारी असलेल्या चव्हाण यांचे घराला ज्या सर्व्हिस वायरने वीजपुरवठा होतो. ती सर्व्हिस वायर अडसूळ यांचे घरावरुन अधांतरी गेली आहे. त्याच खांबावरील एका पडेर नामक ग्राहकाची सर्व्हीस वायर खराब झाली असल्याचे आढळले. या सर्व्हिस वायरमधून सर्वच GI वायरमध्ये वीजप्रवाह उतरला. त्यापैकी चव्हाण यांची GI वायर अडसूळ यांचे पत्र्याच्या ॲगलच्या संपर्कात आल्याने वीजप्रवाह अडसूळ यांचे पत्र्याच्या अँगलमध्ये उतरला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान सोमवारी सकाळी सूर्यकांत अडसूळ यांचेकडे भाड्याने राहणारे सुरेंद्र देविदास भालेकर (वय 45) अंघोळीसाठी गेले असता पत्र्याच्या अँगलला बांधलेल्या तारेवर टॉवेल टाकत असताना त्यांना विद्युतभारीत झालेल्या तारेचा शॉक लागला. त्यांना वाचविण्यासाठी आलेला मुलगा प्रसाद (वय 17) आणि पत्नी आदिका (वय 40) यांनाही शॉक लागला. या दुर्घटनेत तिघांचाही मृत्यू झाला. या घटनेनं गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत महावितरण्याच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.
पुण्याच्या दौंड तालुक्यातील दापोडी येथे विजेचा धक्का लागून भालेकर कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. भालेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आम्ही भालेकर कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. मी मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 17, 2024
पीडित कुटुंबाला…
मृतांच्या वारसांना 4 लाखांची मदत
दरम्यान, महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराचा वीजप्रवाह बंद करुन विद्युत निरीक्षक कार्यालयास पंचनाम्यासाठी बोलावले. पंचनामा व शवविच्छेदन अहवाल लवकरच प्राप्त् होईल. तत्पूर्वी महावितरणकडून वीज अपघातामधील मयतांना प्रत्येकी चार लाख प्रमाणे मदत दिली जाणार असल्याचे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे. तर, पालकमंत्री अजित पवार यांनीही ट्विट करुन माहिती दिली.
हेही वाचा
मतमोजणीचा वाद रंगला, आता ठाकरेंच्या आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल; रवींद वायकरांची होती तक्रार
आणखी वाचा
Advertisement
Advertisement




















