पुणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हींवर निशाणा साधला आहे. देशामध्ये राजकीय नेतृत्व नसल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा राजकीय नेतृत्व दाखविता आले नाही. महाराष्ट्रातही मुख्यमंत्र्यांनी नेतृत्व दाखवले नसल्याची परिस्थिती आहे. देशात लॉकडाऊन संपविण्याच्या मार्गावर आहे. देशातील कंपन्या चालू करणार मात्र त्यातील कामगार पोसणार कसा, याबाबत कोणीच काही बोलायला तयार नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली.


प्रकाश आंबेडकर म्हणाले, लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या कंपन्या चालू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. मात्र या कंपन्यांमध्ये काम करणारा कामगार, अधिकारी यांना पोसणार कसे, मालक कसा पोसणार याबाबत कोणीच काही बोलायला तयार नाही. फिजिकल डिस्टन्स पाहिजे म्हणून सार्वजनिक वाहतूक बंद ठेवणे योग्य आहे. पण ज्या कंपन्यांच्या मालकांकडे गाड्या आहेत, अशा मालकांना गाडी बाहेर काढण्याची परवानगी देण्यात यावी, त्यांना ई पासेसची सक्ती करु नये.


उद्योग क्षेत्राला स्वतःच्या पायावरती उभे करायचे असेल तर उद्योग क्षेत्रातील माणसाला मुबलकता आणि कामानिमित्त फिरण्याची परवानगी दिली पाहिजे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी व्यक्तीगत गाड्यांसाठी ई पासेसचा आदेश काढला आहे, तो ताबडतोब रद्द करावा आणि त्यांना काम करण्याची संधी द्यावी, जेणेकरून महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आणि मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, त्याची गती पुन्हा चालू होईल, अशी अपेक्षा असून येत्या दोन दिवसात ई पासेसचा आदेश रद्द करावा, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.


संबंधित बातम्या :

Unlock 1 | राज्य सरकारची नवी नियमावली जारी, ऑड-इव्हननुसार राज्यातील दुकानं सुरु करण्यास परवानगी