मुंबई : पोलीस भरतीचा (Police Bharti) सराव करणाऱ्या मराठा समाजातील तरुणांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. कारण राज्य शासनाने 17 हजार 471 पोलिसांची भरती करण्यासाठी जी जाहिरात काढली त्यात 10 टक्के मराठा आरक्षण (Maratha Reservation) देखील लागू राहणार आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता आणि या निर्णयाची अमलबजावणी देखील सुरु झाली आहे. त्यामुळे पोलीस भरतीत देखील हे 10 टक्के आरक्षण मराठा समाजातील तरुणांना लागू असणार असल्याची घोषणा फडणवीसांनी विधानपरिषदेत केली आहे. 


विधान परिषदेत नियम 260 अन्वये प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रवीण दरेकर आदी सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना फडणवीस बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले, "लोकप्रतिनिधींना धमक्या देणारे फोन कॉल्स करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहे. 2022-23 मध्ये रिक्त झालेली 100 टक्के पदे भरण्यासाठी निर्बंध मागे घेतले आहेत. त्यामुळे 17 हजार 471 इतकी पोलीस भरती आणखी होणार आहे. ही पोलीस भरती 10 टक्के मराठा आरक्षणासह होणार असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. 






घोसाळकर हत्या प्रकरणाची चौकशी थांबणार नाही


विधानपरिषदेत बोलतांना फडणवीस म्हणाले की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? दुसऱ्या कुणाच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करीत नाही, तोवरच ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर घटना गंभीरच आहे. अंगरक्षकाला सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी थांबणार नाही," असे फडणवीस म्हणाले आहेत. 


पोलिसांच्या कारवाईची दिली माहिती....


राज्यातील महिला अत्याचारावर बोलतांना फडणवीस म्हणाले की, “बलात्काराचे 96 टक्के गुन्हे उघडकीस आले असून, अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे 98.49 टक्के प्रकरणा आहे. यातील 99 टक्के गुन्हे उघडकीस आले आहेत. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 2015 ते 2023 पर्यंत एकूण 12 ऑपरेशन राबवण्यात आले असून, 38,951 बालकांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. यासाठी आमच्या पोलिस दलाचे कौतुक आहे. विशेष हत्यार, अंमली पदार्थ, जुगार कायदा, दारुबंदी कायदा अशा कारवायांमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. 4397 आरोपींवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. 1318 आरोपींवर मोक्काची कारवाई झाली. गेल्यावर्षीशी तुलना केली, तर प्रतिबंधात्मक कारवाईत 69,942 ने वाढल्या आहेत, असेही फडणवीस म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


गावागावात व्हॉट्सअप ग्रुप करा, प्रत्येक तालुक्यात मराठ्यांच्या बैठका; डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी दंड थोपटले